नाशिक । प्रतिनिधी Nashik
पाऊस व गारपिटीच्या येणार्या वृत्तांमुळे द्राक्ष, कांदा व इतर पिके घेणारे महाराष्ट्रातील शेतकरी धास्तावले आहेत. अशा बातम्यांकडे दुर्लक्षच व्हावे असे वाटते.कारण संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस (दि.26जानेवारीपर्यंत) अगोदर सांगितल्याप्रमाणे थंडी तर नाहीच,तसेच कोणतीही गारपीट वा पावसाची शक्यता जाणवत नाही, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.
सातपुडा पर्वताच्या दक्षिणेला संपूर्ण महाराष्ट्र व मध्य भारताच्या मध्यातून एकापुढे एक सरळ अशा प्रत्यावर्ती चक्रीय वार्यांच्या सध्या प्रणाली आहेत. हवेच्या या उच्च दाबाच्या अँटीसायक्लोन प्रणालींच्या मध्यातून छेदून जाणार्या पूर्व-पश्चिम रेषेमुळे उत्तर भारतातून थंडी घेऊन येणार्या वार्यांना अटकाव करणारी नकळत एक पूर्व-पश्चिम हवेच्या उच्च दाबाची काल्पनिक भिंतच महाराष्ट्रात तयार झाली आहे, असेच समजावे.यामुळेच उत्तर भारतातून ईशान्य दिशेकडून थंडी घेऊन येणार्या वार्यांच्या विरोधात महाराष्ट्रातून सध्या 240 डिग्रीतून म्हणजे नेमक्या विरुद्ध अशा नैऋत्य दिशेकडून वाहणारे वारे अटकाव करत आहेत.
त्यामुळेच आपल्याकडे ईशान्येकडून थंडी घेऊन येणारे वारे ठप्प झाले आहेत. त्यामुळे सध्या उत्तर भारतात जबरदस्त पाऊस, बर्फ, थंडी पडत असूनही आपल्याकडे पहाटेच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा वाढ झालेली जाणवत आहे.यामुळेच महाराष्ट्रात विशेष कडाक्याची थंडी सध्या जाणवत नाही. परंतु, महाराष्ट्रात पुढे थंडीची आवर्तने येणारच आहेत. पुढील चार दिवसा(दि.26जानेवारी)नंतर वातावरणात काहीसा बदल जाणवण्याची शक्यता आहे,असेही खुळे यांनी सांगितले.