महाराष्ट्र राज्यातील मेळघाट परिसर व नंदुरबार जिल्हा बालकांमधील कुपोषणामुळे नेहमीच चर्चेत असतो. नंदुरबार जिल्हा हा राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यांपैकी एक समजला जातो. नंदुरबार जिल्ह्यामधील कुपोषित बालकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच ते तीन हजारांनी वाढली आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2020 मध्ये कुपोषित बालकांची संख्या सात हजारांपेक्षा जास्त होती.
बालकांच्या कुपोषणावर मात करण्यासाठी सरकार विविध योजना राबवते. त्यासाठी कोट्यवधींचा निधीही दिला जातो. तो निधी पुरेपूर खर्च होतो असेही सांगितले जाते. तरी कुपोषित बालकांची संख्या वाढतच आहे याचे रहस्य कोण उलगडणार? सरकार खर्च करते असे सांगितले जात असले तरी कुपोषित बालकांवर उपचारासाठी मांत्रिक आणि बाबाबुवांना शरण जाण्याच्या घटना आजही घडत आहेत. हे बाबाबुवा आणि मांत्रिक बालकांवर अघोरी उपचार करतात हे अनेकवेळा समोर येऊनही असे प्रकार घडतच असतात. मेळघाटात नुकतीच एक घटना उघडकीला आली. चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात 3 वर्षांचे बालक कुपोषित आढळले. त्याच्या पालकांनी उपचारासाठी एका मांत्रिकाचा आश्रय घेतला. या मांत्रिकाने त्या अजाण मुलाच्या पोटावर गरम विळ्याने अनेक चटके दिल्याचे उघड झाले आहे. या बालकाची प्रकृती गंभीर आहे.
सविस्तर माहिती घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी माध्यमांना सांगितले. गेल्या वर्षी देखील मेळघाट परिसरात एकाच महिन्यात अशा तीन-चार घटना घडल्या होत्या. त्या घटनांमधील बालकांनाही असेच चटके दिले गेले होते. राज्याच्या दुर्गम आणि अतिदुर्गम भागातच असे अघोरी उपचारांचे प्रकार घडतात असे आत्तापर्यंत मानले जात होते. यावरून शहरी ‘शिक्षित’ आणि ‘सुसंस्कृत’ म्हणवल्या जाणार्या मंडळींकडून आदिवासींवर मागासलेपणाचा शिक्काही मारला जातो.
ग्रामस्थांकडे हेटाळणीच्या नजरेने पाहिले जाते. असे करणे गैर आहे याची जाणीवही या स्वयंघोषित सुशिक्षितांना कधी झाली नसती. पण सुशिक्षितपणाचा शहरी बुरखा शहरांमध्येही अंधश्रद्धेमुळे घडणार्या घटनांनी फाडला आहे. राज्यातील अनेक तालुके आदिवासी बहुल आहेत. या भागातील लोकांवर अंधश्रद्धेचा प्रभाव असतो. पण म्हणून अघोरी प्रकारांचे समर्थन करता येणार नसले तरी या भागातील आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे अनेकदा निघाले आहेत. रुग्णावर उपचार करण्यासाठी या भागातील नागरिकांना रुग्णाची झोळी करून ती पालखी कुटुंबियांच्या खांद्यावर उपचारासाठी जवळच्या आरोग्य केंद्रावर न्यावे लागते.
एवढे करूनही सरकारी आरोग्य केंद्रात डॉक्टर भेटतीलच आणि रुग्णावर तातडीने उपचार होतील याची तरी खात्री कोण देणार? सगळंच कारभार निव्व्ल राम भरोसे! पण शहरात तरी यापेक्षा वेगळे म्हणता येणार नाहीत अशा घटना घडतच आहेत. ताजी एक घटना तर खुद्द पुणे शहरातील.
जे शहर मराठी मुलखाचे ज्ञानभांडार आणि कमालीचे सुसंस्कृत मानले जाते ते म्हणजे पुणे! त्या शहरात सुद्धा भोंदूबाबाने फसवल्याचे प्रकार घडावेत याला काय म्हणावे? पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका व्यावसायिकाला भोंदूबाबाने तब्ब्ल 50-52 लाखांचा गंडा घातला. विद्येचे माहेरघर मानल्या गेलेल्या पुण्यासारख्या शहरात पैशाच्या काल्पनिक पावसात हाती लागलेल्या नोटा घेऊन मांत्रिकाने पळ काढला. अशा प्रकरणांमध्ये लुटले गेल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल होतेच. पण तथाकथीत सुशिक्षितांच्या मूर्खपणाचा त्रास पोलिसांनी तरी का सहन करावा? अशा तक्रारी पोलिसांनी दाखल तरी का करून घ्याव्यात? सध्या पोलिसांनाही त्यांच्या नियोजित कामापेक्षा बरीच वेगळी कामे करावी लागतात.
पोलिसांच्या कामात भर घालणारी मंडळी जनतेलाही माहित आहेत. ते अशी भर का घालतात तेही जनता जाणून आहे. आता निदान जनतेने तरी पोलिसांच्या कामात भर घालू नये आणि अशा तक्रारींची पोलिसांत नोंद करून आपल्या मूर्खपणाची जाहिरात करणे टाळावे हेच बरे नाही का? किमान एवढी तरी अपेक्षा सुशिक्षितपणाचा टेंभा मिरवणार्या शहरवासियांकडून करावी का? दुर्गम भागातील खेडूत आदिवासी निदान जीव वाचवण्यासाठी अंधश्रद्धेला बळी पडतात. पण केवळ आपल्या लोभीपणापायी नोटांच्या पावसासारख्या भाकडकथेवर विश्वास ठेवणार्या शहरी गणंगांची अंधश्रद्धा किती श्रेष्ठ मानावी?