Sunday, June 8, 2025
Homeअग्रलेखमितालीच्या चमकदार यशाची उपेक्षा का?

मितालीच्या चमकदार यशाची उपेक्षा का?

भारतात आजही महिला क्रिकेट पुरुषांच्या क्रिकेट इतके लोकप्रिय नाही. केवळ क्रिकेटपुरतेच नव्हे तर सगळ्याच महिला खेळाडूंना या असमानतेमुळे काहीशी उपेक्षा वाट्याला येते. मुलांच्या तुलनेत मुलींपुढे खेळाचे किती पर्याय उपलब्ध असतात? खेळात करियर करण्याची किती मुलींना मुभा असते? या गृहीतकाला शहरी भागात मोजके अपवाद असतील पण ग्रामीण भागातील चित्र त्याच्या नेमके उलट आहे.

- Advertisement -

झारखंड सारख्या राज्यातील अनेक जिल्ह्यात आजही मुलींना घराच्या अंगणात देखील खेळण्याची का नसावी? भेदभावाचा हा दृष्टिकोन इथपर्यंतच मर्यादित नाही. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा सध्याचा कप्तान कोण याचे उत्तर अजाण बाळे सुद्धा पाठ केल्यासारखे ताबडतोब सांगतील. पण महिला संघाची कप्तान कोण याचे उत्तर किती भारतीय खेळाडू ठामपणे देऊ शकतील? पुरुषांचा संघ 1932 मध्ये क्रिकेटचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. तर महिलांच्या संघाला हाच सामना खेळण्यासाठी 1976 साल उजाडावे लागले.

यंदा प्रथमच भारतीय महिला आणि पुरुषांचा संघ एकाच वेळी इंग्लड दौर्‍यावर गेला आहे. याचे खूप ढोल पिटले गेले. पण महिलांचा संघ तब्ब्ल 7-8 वर्षानंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळणार असल्याचे सांगितले जाते. याकडे कोणाचेच लक्ष का वेधले गेले नसावे? भारताच्या पुरुष संघातील उत्तम दर्जाचे क्रिकेट खेळणार्‍या खेळाडूंना वार्षिक सात कोटी रुपये मिळतात तर त्या तुलनेत संपूर्ण महिला संघाचा वार्षिक करार फार तर पाच कोटींचा असल्याचे सांगितले जाते. महिला संघाच्या सामन्यांची संख्या कमी असल्याचा युक्तिवाद केला जातो. पण तो दोष महिला खेळाडूंचा आहे का? देशात वर्षानुवर्षे या भेदभावाचा सामना करत असूनही अनेक महिला खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत.

क्रिकेट खेळाडू मिताली राजने नुकताच नवा इतिहास रचला. एक दिवसीय क्रिकेटमध्ये मितालीने कारकिर्दीची 22 वर्षे पूर्ण केली. असा पराक्रम गाजवणारी सचिन तेंडुलकर पाठोपाठ ती पहिली खेळाडू आहे. सचिनचा हा विक्रम मोडण्यासाठी तिला अजून फक्त 91 दिवस क्रिकेट खेळावे लागेल. 26 जून 1999 साली ती पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामना खेळली होती. क्रिकेटमधील एवढी प्रदीर्घ कारकीर्द अजून कोणत्याही देशाच्या खेळाडूची बहुधा नसावी. असे अनेक विक्रम तिच्या नावावर जमा आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा विक्रम करणारी ती जगातील दुसरी फलंदाज आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा तिच्या नावावर आहेत.

महिलांच्या एक दिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठणारी ती एकमेव खेळाडू आहे. संघाचे कर्णधारपदही तिने भूषवले आहे. मिताली गेली 22 वर्षे सलग क्रिकेट खेळत आहे. तिच्या या पराक्रमाची दखल समाज, क्रीडा जगत आणि माध्यमांमध्ये कितीशी घेतली गेली? असे का घडले असावे? खेळाडू महिला असो की पुरुष मैदानावर सारखीच मेहनत करावी लागते. तंदुरुस्ती राखण्यासाठी सारखाच घाम गाळावा लागतो. महिलेने कितीही पराक्रम गाजवला आणि उच्च पद भूषवले तरी तिला कधी ना कधी घर आणि दार अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावीच लागते.

पुरुषप्रधानता आणि त्याचा प्रभाव फक्त इतिहासकाळातील महिलांना सहन करावा लागला असे काही जण मानतात. तथापि पुरुषप्रधानतेचे चटके आजही विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवणार्‍या महिलांना बसतच असतात. मितालीच्या पराक्रमाकडे केवळ ती मुलगी आहे म्हणून दुर्लक्ष केले जात असावे असे आजही समाजाला वाटू नये का? पुरुषप्रधानतेची पट्टी पुरुष वर्गाच्या डोळ्यावरून अजूनही बाजूला सरकत नाही याचेच हे निदर्शक नाही का? मितालीचे यश सर्वांनी बेदखल ठरवावे असे आहे का? माध्यमे ‘सर्वात आधी’च्या चढाओढीत नको त्या मुद्यांचे देखील ढोल पिटतात.

त्यांनाही मितालीची दाखल घ्यावीशी का वाटली नाही? मितालीच्या कारकिर्दीवर आणि तिने केलेल्या संघर्षावर प्रकाश टाकावा आणि इतरांना प्रेरणा द्यावी असेही माध्यमांना का वाटू नये? खेळाडूच्या यशाकडे पुरुषप्रधान दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता अद्यापही भासतच राहणार का? भारतीय समाज महिलांच्या बाबतीत समानतेचा दृष्टिकोन बाविसाव्या शतकातही स्वीकारू शकत नाही असा निष्कर्ष कुणा पाश्चात्य विद्वानाने नोंदवला तर मात्र माध्यमे कदाचित खडबडून जागी होतील.

भारताच्या विश्वगुरुत्वाची आठवण देण्यासही माध्यमे विसरणार नाहीत. स्त्री-पुरुष समानतेचा लढा महिलांनाच जास्त लढावा लागणार आहे. त्यासाठी अशा कितीतरी मितालीना अविरत कष्ट उपसावे लागणार आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सतत त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न यापुढेही सतत चालूच राहाणार का? ‘थांबला तो संपला’ याचे भान ठेऊन विविध क्षेत्रातील वाटचाल महिलांनाच चालू ठेवावी लागणार का?

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राज-का-रण : कोण आहेत हो हे सुधाकर बडगुजर..?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - सल्लागार संपादक बडगुजर काही दिवसातच गिरीश महाजन यांच्या गळ्यातील ताईत बनलेले दिसतील आणि पुढील चार वर्षात भाजपचे विधानसभेचे उमेदवार झाल्यास...