Saturday, September 28, 2024
Homeब्रेकिंग न्यूजसरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

सरकार बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही!

शरद पवार यांचा निर्धार

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

आमच्या नावावर निवडून आले आणि मग भाजप सोबत सत्तेत जाऊन बसले. या लोकांनी जनतेची फसवणूक केली आणि सत्तेमध्ये सहभागी झाले. ज्यांनी आमच्या नावावर निवडणुका जिंकल्या त्यांनी आम्हाला सोडून दिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सरकार बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केला.

बीड जिल्ह्यातील परळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते राजेश उर्फ राजाभाऊ फड यांनी आज पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटावर नाव न घेता टीका केली. ही तर फक्त सुरुवात आहे. परळीमध्ये मोठी सभा आपण घेऊ आणि आपण आपली ताकद दाखवून देऊ, असेही पवार म्हणाले.

सत्ता ही लोकांसाठी वापरायची असते. पण तुमच्या भागात सत्तेचा दुरुपयोग केला जातो. त्यावर जो कोणी आवाज उठवतो, त्याचा आवाज दाबला जातो. राजकारण हे समाजकारणाला स्थान देणारे पाहिजे. आता चित्र बदलत असून लोकसभा निवडणुकीत ते दिसले आहे. देशाचे पंतप्रधान सांगत होते आम्ही ४०० पार निवडून येणार. पण त्यांचे किती खासदार आले? असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसने १० जागा लढवल्या, त्यापैकी ८ जागा आपण जिंकून आणल्या, असे शरद पवार म्हणाले.यावेळी राज्यसभा सदस्य फौजिया खान, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या