Saturday, July 27, 2024
Homeनाशिकउद्योजक, वाहतूकदारांच्या समस्या सोडवू

उद्योजक, वाहतूकदारांच्या समस्या सोडवू

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील उद्योजक (Entrepreneur) व वाहतूकदारांच्या (transporters) वाहतूकविषयक समस्या सोडविल्या जातील आणि त्याबाबतचा कृतीआराखडा 4 ते 5 महिन्यांत केंद्राला सादर करण्यात येईल, असे आश्वासन वाणिज्य व उद्योग मंत्रालयाचे प्रतिनिधी अभिजित मिश्रा यांनी दिले.

- Advertisement -

केंद्र सरकारच्या धोरणानुसार देशतील उद्योजक आणि वाहतूकदारांच्या वाहतूक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी केंद्राच्या वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालयातर्फे सर्व्हे घेण्यात येत असून त्याच अनुषंगाने आयमातर्फे के. आर. बूब कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित चर्चासत्रात मिश्रा बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, बीओटी चेअरमन धनंजय बेळे, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सचिव गोविन्द झा, योगिता आहेर, जिल्हा मालवाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र फड आदी होते.

यावेळी मिश्रा यांनी पुढे लॉजिस्टिक सेक्टर, वाहतूकदार, वाहतूकसेवा पुरवठादार, टर्मिनलचालक,आयात आणि निर्यातदार यांच्यासाठी केंद्रसरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती देऊन उपस्थित उद्योजक आणि मालवाहतूकदार यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

प्रारंभी आयमा अध्यक्ष निखिल पांचाळ उद्योजकांच्या विविध समस्यां सोडवण्यासाठी आयमातर्फे ( AIMA )सुरू असलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.

उद्योजकांपुढे वाहतूक विषयक समस्यांचा डोंगर आ वासून उभा असून, त्याचे तातडीने निराकरण व्हावे असेही ते म्हणाले. केंद्र सरकारने यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत सर्वांची मते जाणून घेण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आल्याचेही पांचाळ यांनी सांगितले. बीओटी समितीचे चेअरमन धनंजय बेळे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्ह्यातील सातपूर, अंबड, सिन्नर, गोंदे, वाडीवर्‍हे औद्योगिक वसाहतींसाठी पूरक असे लॉजिस्टिक पार्क व ट्रक टर्मिनल उभारण्याची गरज प्रतिपादन केली.

वाहतूकदार, वाहतूकसेवा पुरवठादार यांना राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीत लॉजिस्टिक पार्क उभारावे, स्वच्छतागृह, फोन, झेंरॉक्स निवारा आदी सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात. मालाची नासधूस होऊ नये यासाठी सर्व राज्यांत कोल्ड स्टोरेज उभारावेत, वाहतूकदारांच्या काही त्रुटी असल्यास नाक्यावर चलन द्यावे मात्र त्यांची वाहने अडवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

वाहतूक व्यवसाय हा अत्यंत गरजेचा असतांनाही त्यांच्या समस्या मात्र कोणतीही यंत्रणा जाणून घेत नाही आणि त्यामुळे हा व्यवसाय करणार्यांची तसेच त्यासाठी आवश्यक घटक असलेल्या चालकांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आह,े अशी खंत वाहतूकदार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नाना फड यांनी व्यक्त केली.

चर्चासत्रात भाग घेतांना उपस्थित उद्योजक आणि वाहतूकदार यांनी समस्या,चालकांची सुरक्षितता,आजारपण, प्रवास मार्गात होणारी लूटमार, आरटीओ समस्या आणि होणारे अपघात, पोलिसांचा ससेमिरा, एका राज्यातून दुसर्या राज्यात प्रवेश करतांना असलेल्या जाचक अटी आणि त्यांना होणारा मनस्ताप आणि मानसिक छळ याबात आपापले अनुभव कथन केले. त्याबाबत केंद्र सरकारने लवकरात लवकर सुधारण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. आयमा सदस्य हर्षद बेळे यांनी या व्यवसायातील एक खिडकी योजना व टेंडर कालावधीच्या पद्धतीत सुधारणा करण्याची गरज प्रतिपादन केली.

यावेळी आयामा सदस्य राहुल गांगुर्डे, अभिषेक व्यास, रवींद्र झोपे, देवेंद्र राणे, जगदीश पाटील, हेमंत खोंड, एनडीटीएचे पी.एम.सैनी, सुभाष जांगरा, संजय राठी, बालाजी ट्रान्स्पोर्टचे जयपाल शर्मा, यशपाल पवार, सुनील भुरे, सूरज शहा आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या