अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान, नगरमध्ये आयोजित खास कार्यक्रमात अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली झालेले आशिष येरेकर यांचा सन्मान करत त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी येरेकर म्हणाले, आई-वडिलांमुळे लहानपणापासून कष्ट आणि गुणवत्तेची सवय लागली. गडचिरोली ते अमरावती व्हाया अहिल्यानगर हा प्रवास निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक अधिकारी आणि विभागात समवेत काम करत असताना जिल्हा परिषद या संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याचा सतत प्रयत्न केला. इथल्या विविध उपक्रम व प्रगतीचा अभिमान राहील. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्हा अग्रेसर ठेवण्यात प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांची सतत साथ मिळाली. नगर जिल्ह्याने मला घडवले आणि प्रेम देखील दिले, असे येरेकर म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुकुंदराव येरेकर, आई नंदाताई येरेकर, दिपाली येरेकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. विविध कर्मचारी संस्था संघटना यांच्या वतीने येरेकर व भंडारी यांचे सत्कार झाला. शेळके यांनी प्रास्ताविक केले.
जयश्री कार्ले, नानासाहेब रोहकले, संजय कळमकर, डॉ. दशरथ दिघे, गायसमुद्रे, दशरथ शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. सेवेच्या कमी कालावधीत उच्चतम असा प्रशासकीय अनुभव श्री येरेकर यांनी प्राप्त केलेला आहे.राज्यातील मोजक्या कार्यक्षम कर्तृत्ववान अधिकार्यांमध्ये येरेकर यांचे नाव घेतले जाते.अमरावती जिल्हाधिकारीपदी देखील सर्वोत्कृष्ट काम करून राज्यात निश्चितच ते बहुमान प्राप्त करतील, असे प्रतिपादन नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी केले.