Thursday, October 24, 2024
Homeजळगावसेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द करा

सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द करा

शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा

जळगाव, -राज्यात कमी पटसंख्येच्या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक नियुक्तीचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी आज प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आज जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
राज्यात खासगी तसेच विनाअनुदानीत शाळांमुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची स्थिती बर्‍याच ठिकाणी गंभीर आहे. ग्रामीण भागात काही ठिकाणी २० किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत नियमित शिक्षक व मुख्याध्यापकांसह अन्य पदांऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्तीचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय सेवत असलेल्या प्राथमिक शिक्षकांवर अन्यायकारक आहे. शिक्षकांना निवडणूकीची देखील बीएलओ सारखी अतिरिक्त कामे देण्यात येत असल्याने शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याच्या निषेधार्थ हा मोर्चा होता.
काळ्या फिती लावून काम
प्राथमिक शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी नियमित पाठ, शैक्षणिक कामकाज करण्यात आले. परंतु शासन निर्णयाच्या निषेध म्हणून काळ्या फिती लावूनच शैक्षणिक कामकाज करण्यात आले असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष अजबराव पाटील यांनी सांगितले.आक्रोश मोर्चात जिल्हाभरातून अनेक प्राथमिक शिक्षक -शिक्षीका सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोचलेला मोर्चातील हजारोंची गर्दी स्वातंत्र्य चौकापर्यंत होती. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे सभेत रूपांतर होवून प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची भेट घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांना न्याय्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिक्षक संघटना समन्वय समितीचे सुनिल निंबा पाटील, सुनिल पाटील, ग.स.सोसायटीचे रविंद्र पाटील, सुनील गरूड, प्रविण पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या