मुंबई/अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
विद्यार्थ्यांना उत्सुकता लागलेल्या 11 वी प्रवेशाची पहिली यादी शनिवारी जाहीर झाली. ठरवून दिलेल्या डेडलाईनच्या दोन दिवसांआधीच 11 वी प्रवेशाची यादी जाहीर झाल्याने सुमारे दीड महिन्यांपासूनची विद्यार्थी व पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात 11 वीच्या 80 हजारांहून अधिक जागा उपलब्ध होत्या. तर 11 वी प्रवेशासाठी 52 हजार 232 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर संबंधीत विद्यार्थ्यांसह कॉलेजला 11 वी प्रवेशाची स्थिती स्पष्ट झाली आहे. आता उद्या सोमवारपासून ज्यांचा प्रवेश निश्चित झाला त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
यंदापासून ऑनलाईन राबवण्यात येणार्या 11 वीच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. जवळपास मागील दीड महिन्यापासून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी अकरावी प्रवेशाची वाट पाहत होते. राज्यातील 12 लाख 71 हजार विद्यार्थ्यांनी यंदा अकरावीत कॉलेजसाठी ऑनलाइन प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
सरकारच्यावतीने जाहीर केलेल्या यादीनुसार 30 जून ते 7 जुलै दरम्यानच्या कालावधीत पहिल्या गुणवत्ता यादीमध्ये कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचा आहे. संगणक प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल करुन पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रवेश प्रक्रिया होण्यासाठी पहिली गुणवत्ता यादी आता 30 जून रोजी जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, दोन दिवस आधीच यादी जाहीर झाली असून 1 ते 7 जुलै दरम्यान मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठीचा वेळ दिला आहे. राज्याच्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला होता. त्यानंतर जवळपास दीड महिना 11 वी प्रवेशाचा घोळ सुरू होता. आता 11 वी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाल्याचे शिक्षण संचालनालयाने याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.





