मुंबई | प्रतिनिधी Mumbai
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला यावेळेस अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दुःख आहे. पण म्हणून खचून जाणारे आपण नाही. आपले जे नगरसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असे दिसले तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील, असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केला.
राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले. या निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळाले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे या महापालिकेत मनसेची कामगिरी निराशाजनक झाली. मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती करूनही मुंबईत मनसेचे फक्त सहा उमेदवार निवडून आले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज एक्स या समाज माध्यमातून पक्षाच्या नवनिर्वाचित नवरसेवकांडून चांगल्या कामाची अपेक्षा केली आहे.
यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. आपली लढाई मराठी माणसाची, मराठी भाषेची, मराठी अस्मितेची आणि समृद्ध महाराष्ट्रासाठीची आहे. ही लढाई हेच आपले अस्तित्व आहे. अशा लढाया या दीर्घकालीन असतात याचे भान तुम्हा सगळ्यांना आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिसरात असो की एकूणच राज्यात मराठी माणसाला नागवण्याची एकही संधी सत्ताधारी आणि त्यांच्या आश्रयाला गेलेले सोडणार नाहीत. त्यामुळे आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभे रहायचे आहे. निवडणुका येतील जातील. पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचे नाही, अशी सूचनाही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली आहे.
नवनिर्वाचित नगरसेवकांनी घेतली भेट
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज राज ठाकरे यांची त्यांच्या शिवाजी पार्क येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे यांनी निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले.




