नाशिक | प्रतिनिधी
जिल्ह्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी नागरिक अडकले होते. मात्र स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा व आपदा मित्र यांच्या मदतीने सर्व अडकलेल्या २५ नागरिकांची यशस्वी सुटका करण्यात आली आहे.
येवला तालुक्यातील अंदरसुल, कोळगाव येथे शेतात अडकलेल्या १३ जणांची सुटका करण्यात यश आले आहे. स्थानिक यंत्रणांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून त्यांना सुरक्षित बाहेर काढले. याच तालुक्यातील भारम गावात दोन वयोवृद्ध नागरिक अडकले होते, त्यांचीही मालेगाव येथील आपदा मित्र टीम आणि स्थानिक प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून सुटका करण्यात यश आले.
नाशिक तालुक्यातील लाखलगाव येथे गोदावरी नदी पात्रात अडकलेल्या दोन गायींनाही सुरक्षित बाहेर काढण्यात आले. ही कारवाई स्थानिक टीमने केली.
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दावलेश्वर येथे पाण्यात अडकलेल्या ६ नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली, यासाठी स्थानिक यंत्रणांनी अतिशय चोख कामगिरी बजावली.
दरम्यान, जिल्ह्याबाहेरील कोपरगाव (जि.अहिल्यानगर) येथे ६ व्यक्तींचे एक कुटुंब अडकले असल्याची माहिती मिळताच, नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील ३ कर्मचारी आणि ४ आपदा मित्रांची टीम तत्काळ रवाना करण्यात आली आहे.
नागरिकांनी सहकार्य करावे
सर्व बचावकार्य वेळेवर आणि यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक ठिकाणी प्रवास टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.




