मुंबई:
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे. ‘ब्रेक द चेन’ सुरु असूनही रुग्णसंख्या कमी होत नाही. यामुळे राज्यात तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन होऊ शकतो, असे संकेत काँग्रेसचे नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत
करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. आजपासून विकेण्ड लॉकडाउन सुरु होत असून त्यासंबंधी एका वृत्तवाहिनीवर विचारण्यात आले असता, ते म्हणाले की, “विकेण्ड लॉकडाउनची आवश्यकता होती. रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे हा आकडा पुढील १० दिवसांत महाराष्ट्रात १० लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. मग अशा परिस्थितीत भविष्यात पूर्णच लॉकडाऊन करावा लागेल. रेल्वेवर निर्बंध आणावे लागतील, गर्दी कुठेही होणार नाही हे पहावे लागेल”.
अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत घेणार
कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणि गर्दी टाळण्याची गरज आहे. अन्यथा कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडेल. त्यामुळे आम्ही अंतिम वर्षाच्या डॉक्टर्सना सेवेत सामावून घेत आहोत. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनाही आम्ही सेवेत सामावून घेतले आहे. या माध्यमातून ५५०० हजार डॉक्टर्स उपलब्ध होत आहेत. कोरोनाचा वाढता आकडा पाहता हे मनुष्यबळही अपुरे पडेल. त्यामुळे निष्पाप लोकांचे जीव वाचवण्यासाठी तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.