पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
“भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाच्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून उभा आहे. विद्यार्थ्यांनी संविधान केवळ वाचू नये, तर ते आपल्या विचारांत आणि कृतीत उतरवावे. हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल,” असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
झेप कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, नाशिक यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आयोजित भव्य राष्ट्रभक्तीपर समूहगान कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नाशिक शहरातील ८१ शाळांमधील तब्बल ३१ हजार विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिस्तबद्ध पद्धतीने देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा उपक्रम नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद असल्याचे महाजन यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक गुरमीत बग्गा यांनी केले. देशभक्तीपर गीतांमधून विद्यार्थ्यांवर संस्कार रुजतात, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रतिभा धोपवकर यांनी केले. पंचवटी परिसर देशभक्तीपर वातावरणाने दुमदुमून गेला.




