नवी दिल्ली – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) प्रमाणपत्राची मर्यादा वाढवण्यात आली असून आता शिक्षक पात्रता परीक्षांचे प्रमाणपत्र आयुष्यभरासाठी वैध राहणार आहे. याबाबतची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी केली आहे. Teacher Eligibility Test (TET)
यापूर्वी प्रमाणपत्राची वैधता सात वर्षासाठी होती. मात्र, आता ही वैधता संपुष्टात आणली आहे. सात वर्षाच्या कालावधीत उमेदवाराला नोकरी लागली नाही, तर पुन्हा परीक्षा द्यावी लागत होती. आता या निर्णयामुळे इच्छुक शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय मंत्री म्हणाले, राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना शिक्षण क्षेत्रात करिअर करु इच्छिणार्या उमेदवारांना नवे प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच 2011 या वर्षानंतर ज्या उमेदवाराचे शिक्षण पात्रता प्रमाणपत्र समाप्त झाले आहे. अशांना हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
दरम्यान, शासकीय शाळांमधील शिक्षक होण्याची इच्छा असणार्या उमेदवारांना आणि ज्या शिक्षकांनी यापूर्वी टीईटीचं प्रमाणपत्र मिळवलं असेल पण मुदत संपली असेल त्यांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. 2011 नंतर टीईटी उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची प्रमाणपत्र आयुष्यभर वैध असतील.