अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
अवैधरित्या रेशनचे धान्य साठवून त्यापासून पीठ तयार केले जात असल्याची बाब शहर पोलीस व जिल्हा पुरवठा विभागाने उघडकीस आणली. या प्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून दोघे जण पसार झाले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात दोन फिर्यादीनुसार 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आठ आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गणेश श्रीनिवास झंवर, जालिंदर नवनाथ चितळे, जालिंदर सुभाष जगताप, संदीप कारभारी पागिरे, सुरेश बबन रासकर, सागर अशोक नांगरे, अदिनाथ सुखदेव चव्हाण, भगवान हरिभाऊ छत्तीशे असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. यातील संग्राम रासकर व आसाराम रासकर हे दोघे बाप-लेक पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. कोतवाली पोलीस व पुरवठा विभागाने केलेल्या कारवाईत नगर मार्केट यार्ड व केडगाव इंडस्ट्रीयल परिसरात छापे टाकले होते.
मार्केटयार्ड येथील दुकानातून 419 गोण्या तांदूळ व 125 गोण्या गहू, केडगाव येथील नर्मदा प्लोर मिलच्या गोदामात 132 गोण्या तांदूळ, 247 गोण्या गहू मिळाला आहे. तसेच चार ट्रक, दोन टेम्पो असा 40 लाख 99 हजार 375 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.