Friday, May 3, 2024
Homeनगरलोकशाही संपवून हिटलरशाही आणण्याचा भाजपाचा डाव

लोकशाही संपवून हिटलरशाही आणण्याचा भाजपाचा डाव

देवळाली प्रवरा |वार्ताहर| Deolali Pravara

लोकशाही संपवून हिटलरशाही आणण्याचा भाजपाचा डाव देशातील जनता हाणून पाडेल, कामगार, कष्टकरी, शेतकरी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असून या सरकारला याची किंमत मोजावी लागेल. लखीमपुर हत्याकांड देशाच्या लोकशाहीला काळिमा फासणारे आहे, असे प्रतिपादन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

- Advertisement -

लखीमपूर हत्याकांडाचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने व भाजपा विरोधी पक्षांनी महाराष्ट्र बंदचे आयोजन केले होते. या बंदच्या पार्श्वभुमीवर देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथे सभा घेऊन या घटनेचा निषेध करून बंद पाळण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, राष्ट्रवादी नेते अजित कदम, शिवसेना शहरप्रमुख सुनील कराळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण, नगरसेवक शैलेंद्र कदम, संचालक अशोक खुरुद, कामगार नेते नानासाहेब कदम, राजेंद्र कदम, अरुण ढुस, वैभव गिरमे, राजेंद्र लांडगे कृष्णा मुसमाडे, विश्वास पाटील, दीपक पठारे, कुणाल पाटील, दीपक कदम, चंद्रकांत दोंदे, ऋषिकेश संसारे, शुभम पाटील, कारभारी होले, शरद संसारे, दगडू सरोदे ,कुमार भिंगारे, राहुरी फॅक्टरी येथे झालेल्या सभेमध्ये विजय गव्हाणे, दीपक त्रिभुवन, प्रदीप गरड विष्णूपंत गीते, सुनील विश्वासराव आदी मान्यवर उपस्थित होते.

चव्हाण म्हणाले, मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे केल्यामुळे देशातील शेतकरी संतप्त आहेत. शेतकर्‍यांची शेती व शेत जमिनी खाजगीकरण करून उद्योजकांच्या घशात घालण्याचे काम हे सरकार करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी गेली काही दिवसांपासून विविध प्रयोग सुरू आहेत. लखीमपूर हत्याकांड हे देशाच्या इतिहासाला काळिमा फासणारे आहे. याची किंमत मोदी सरकारला मोजावीच लागेल. लोकशाही पायदळी तुडवून शेतकर्‍यांना धुळीस मिळवण्याचा प्रयत्न देशातील शेतकरी कधीही यशस्वी होऊ देणार नाहीत.

राष्ट्रवादीचे नेते अजित कदम म्हणाले, शेतकरी विरोधी कायदे करणार्‍या मोदी सरकारला रोखण्यासाठी राज्यांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या पक्षाचे नेते एकत्र येऊन त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. शेतकर्‍यांच्या विरोधात मोदी सरकारचे मोठे षड्यंत्र सुरू आहे. कामगार कायदे रद्द करून उद्योजकांना मोठे करण्याचे काम मोदी सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.

मात्र देशातील शेतकरी पेटून उठला आहे. गगनाला भिडणारी महागाई, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न, शेतकर्‍यांचे प्रश्न अशा अनेक समस्यांमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. शेतकरी हा देशाचा कणा आहे. कोरोना कालावधीमध्ये त्यानेच देशाची आर्थिक स्थिती सुधारित ठेवली त्याच शेतकर्‍याला धुळीत मिळवण्याचे काळे कायदे मोदी शासनाकडून केले जात आहेत. मात्र या सरकारला आता धडा शिकवल्याशिवाय जनता शांत राहणार नाही. सूत्रसंचालन नानासाहेब कदम यांनी केले तर आभार कृष्णा मुसमाडे यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या