गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav
श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील गावतळे परतीच्या वरूणराजामुळे ओव्हर फ्लो झाले. गोंडेगाव गावतळे हे गावाच्या अमरधामजवळ असून या तळ्याला चारही बाजूने पाणी येते. या तळ्याचा गावाला तसेच अनेक शेतकर्यांना फायदा होतो. हे तलाव भरल्यानंतर 24 तासांत गावची सार्वजानिक विहीर, विंधन विहीर, हातपंप यांची पाणीपातळी वाढते. या तळ्यात पाणी भरल्यानंतर उन्हाळ्यापर्यंत पाणी साठले जाते. ज्यामुळे गावातील अनेक जनावरांचा पाणीप्रश्न सुटतो.
गोंडगाव पंचक्रोशीतील चारी क्रमांक 19 व 20 चारी क्षेत्रातील गावतळे व पाझर तळे भरून मिळावे म्हणून गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य तसेच गावातील युवानेते मंडळींनी पाटबंधारेमंत्री जयंत पाटील, आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, तसेच पाटबंधारे अभियंता श्री. गायकवाड यांना अनेक निवेदने देऊनही गावतळ्याला पाणी मिळाले नाही; परंतु परतीच्या वरुण राजाने गावातील नागरिकांची तहान भागवणारे गावतळे भरून हा प्रश्न सोडविला आहे.
या गावतळ्याचे खोलीकरण झाल्याने या परिसरातील अनेक शेतकर्यांंना उन्हाळ्यातही पाण्याची टंचाई जाणवली नाही. आता यापुढे गाव तलावात पाटबंधारेचे दर रोटेशनला पाणी सोडण्यात यावे, यासाठी गावातील सर्व नेते मंडळींनी गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी प्रयत्न केले तर गावाची तहान कायमस्वरूपी भागेल, अशी भावना सर्व सामान्य नागरिकांची आहे
ग्रामपंचायतची पाणी शुद्धीकरण यंत्रणा बर्याच दिवसांपासून बंद अवस्थेत असून गावात पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट आहे. आता तलाव भरल्याने अनेक विंधनविहीर व हातपंपाद्वारे तहान भागवली जाईल; परंतु लवकरात लवकर पाणी फिल्टर चालू करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.