नाशिक | प्रतिनिधी
शेतकऱ्यांच्या दृष्टीने गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या हे पशुधन लाखमोलाचे असते.लम्पीसारख्या आजारात या पशुधनाची होणारी हानी रोखण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाकडून राज्यभरात आता ८० फिरत्या पशुचिकित्सा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिक विभागात नाशिक ४,नंदुरबार २, धुळे २ तर जळगाव जिल्ह्याला पाच अशा एकूण १३ व्हॅन पुरविलया जाणार आहेत.१९६२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करताच पशुवैद्यकासह ही फिरती पशुचिकित्सा व्हॅन जनावरांवरील उपचाराकरिता दाखल होणार आहे.
फिरत्या पशुचिकित्सा पथकांत वाहनचालक तथा परिचर, एक पदवीधर पशुवैद्यक व एक पशुधन पर्यवेक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपचारांसाठी तसेच रेतनासाठी आवश्यक साहित्य व उपकरणांनी सज्ज अशी ही व्हॅन जिल्हा तालुका पशुवैद्यकीय चकित्सालयांच्या नियंत्रणात राहणार
आहे.विशेष म्हणजे अशा पशुवैद्यक, पर्यवेक्षक आणि परिचर, कम वाहनचालकांची सरकारकडून लवकरच भरतीही केली जाणार आहे. हे उपचार निःशुल्क करण्यात येणार असून, यासाठी सरकारी दरानुसार सेवाशुल्कही आकारण्यात येणार नाही.
कुठे किती व्हॅन?
कोकण विभागात पालघर, मुरबाड, पेण, रत्नागिरी, कणकवली तालुक्यांत प्रत्येकी एक त्याचप्रमाणे हानी मुंबई शहर व उपनगरांसाठी चार व्हॅन, पुणे विभागात दौंड, सोलापुरातील चार तालुके, साताऱ्यातील दोन तालुक्यांत, कोल्हापूर २, नाशिक विभागात नंदुरबार २, धुळे २, जळगाव ५, नाशिक ४, जालना १, छत्रपती संभाजीनगर ४, बीडमधील २ तर लातूर विभागात नांदेडमधील ४, हिंगोलीत १ तर धाराशिवमधील दोन तालुक्यांत ही व्हॅन पुरविली जाणार आहे.