नवी दिल्ली | New Delhi
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने इस्राइलला जाणारी आपली उड्डाणे रद्द केली आहेत. भारताने इस्राइलला जाणारी सर्व उड्डाणे ही १४ ऑक्टोबर पर्यंत रद्द करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. तर या कालावधीमध्ये ज्या लोकांनी बुकिंग केले होते, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे आश्वासन एअर इंडियाकडून देण्यात आले आहे.
एअरलाइनने सोशल मीडियावर जाहीर केले आहे की, ‘प्रवासी आणि चालक दलाच्या सुरक्षेसाठी, तेल अवीवची आमची उड्डाणे १४ ऑक्टोबर २०२३ पर्यंत निलंबित राहतील. या कालावधीत, आम्ही कोणत्याही फ्लाइटमध्ये निश्चित आरक्षण असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.’ एअर इंडियाची तेल अवीवसाठी साप्ताहिक ५ उड्डाणे आहेत.
एअर इंडियाची तेल अवीव साठी दर आठवड्यातून ५ उड्डाणे केली जातात. याआधी शनिवार रोजीचे फ्लाईट क्रमांक AI 139 आणि परतीचे फ्लाईट AI 140 जे नवी दिल्ली ते तेल अवीव उड्डाण करणार होते, ते देखील रद्द करण्यात आले.
हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध शनिवारी सुरू झाले, जे दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. रविवारी झालेल्या युद्धात आपले ३० सैनिक मारले गेल्याचे इस्रायलने म्हटले आहे. त्याचवेळी इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की त्यांच्या कारवाईत आतापर्यंत ४०० हमास दहशतवादी मारले गेले आहेत तर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, आतापर्यंत इस्रायलमध्ये सुमारे ३०० लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे १५९० लोक जखमी झाले आहेत. तर गाझामध्ये २३२ लोकांचा मृत्यू झाला आणि १७९० लोक जखमी झालेत. गाझामध्ये असलेल्या पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून आत्तापर्यंत २५६ पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यात २० मुलांचा समावेश आहे. तर यामध्ये आतापर्यंत १७८८ पॅलेस्टिनीही जखमी झाले आहेत.