Sunday, May 19, 2024
Homeक्रीडाRound The Wicket: लई भारी!

Round The Wicket: लई भारी!

– डॉ अरुण स्वादी

काश ये वर्ल्ड कप फायनल होता…! काश यह इंडियाने जीता हुआ थर्ड वर्ल्ड कप होता, लेकिन इंडियाने जो किया वो सपनेसे कम नहीं था… वेल डन इंडिया…!

- Advertisement -

लीग स्टेजला भारताची कामगिरी स्वप्नवत होती यात शंका नाही. दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात त्यांनी आपल्या कामगिरीवर कळस चढवला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीची सर्व संघांनी धास्ती घेतली होती. भारताने त्यांचा फुगलेला फुगा फोडला.

खरे तर त्यांच्या आत्मविश्वासाला टाचणी नाही तर कात्री लावली. पहिल्या सत्रात चेंडू फूटभर वळला तेव्हाच आफ्रिकेच्या नशिबात नंतर काय लिहून ठेवले आहे याची कल्पना येत होती. प्रश्न एवढाच होता की, ईडन गार्डन्सची विकेट अंडर लाइट्स कशी वागेल? झाले तसेच! दक्षिण आफ्रिका संघ भारताच्या ३२४ धावांचा पाठलाग करताना अक्षरशः कोसळून पडला. स्पिनर जडेजाने ५ विकेट घेत आफ्रिकेवर मोठ्या पराभवाची नामुष्की आणली.

प्रथम फलंदाजी करताना रोहितने पुन्हा एकदा सुरेख सुरुवात करून दिली. सध्या त्याची बॅट बोलते आहे आणि विराटची बरसते आहे. शतक कसे रचायचे याचा विराटने धडा घालून दिला. सचिनच्या विक्रमाशी बरोबरी करून त्याने एक मोठा पल्ला गाठला. श्रेयस अय्यर स्थिरावला आहे. त्याचा आत्मविश्वास दुणावला आहे. मोठे फटके मारायची रिस्क तो घेतो आहे.

कारण टीमने तसे करायला त्याला सांगितले आहे. मात्र विकेट किंचित संथ व फिरकी घेणारी आहे ते जोखून विराटने आणि त्याने काही काळ बॅट म्यान करायची हुशारी पण दाखवली. एकूणच, भारताचे डावपेच यशस्वी होताना दिसत आहेत. मात्र एक डावपेच बुमरांग होऊ शकतो. तो आहे पांड्याच्या जागी तेज गोलंदाज निवडायचा.

हार्दिक पांड्याची कमतरता अजूनपर्यंत जाणवली नसली तरी बाद फेरीत ती जाणवू शकते. प्रसिद्ध कृष्णा या फक्त आणि फक्त तेज गोलंदाज असणाऱ्या खेळाडूला निवडून निवड समितीने काय साधले आहे कोणास ठाऊक? हे म्हणजे डोळ्यात केर आणि कानात फुंकर झाली. ही घोडचूक ठरू नये हीच अपेक्षा! एरवी भारताच्या ‘पाँचों उँगलियाँ घी में’ आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या