भाजीपाला विक्रेत्यांनाही उठवले; लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी
संगमनेर (शहर प्रतिनिधी)- संगमनेर शहर व परिसरात महसूल व पोलीस प्रशासनाने लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणार्या मोटरसायकलस्वारांवर पोलिसांनी कडक कारवाई केली असून 200 पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. महामार्गावर भाजीपाला विक्री करणार्यांनाही पिटाळून लावण्यात येत आहे.
संगमनेरात कोरोनाबाधीत 4 नागरिक सापडले आहेत. कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. तीन दिवसाच्या संपूर्ण लॉकडावून नंतर दुपारी अत्यावश्यक सेवेसाठी 12 ते 3 या वेळेत मोकळीक देण्यात आली. या वेळेतही नागरिकांची गर्दी होवू नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
लॉकडाऊनच्या काळात अतिशय महत्वाचे काम असेल तरच घराच्या बाहेर पडा असे आवाहन करण्यात येत आहे. मोटरसायकल व खाजगी वाहनांचा वापर टाळावा आवश्यकता असेल तरच वाहने वापरा, असे पोलीस सांगत आहे. या वाहन वापरातही मर्यादा घालण्यात येत आहे.
शहरातील दिल्ली नाका परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बाहेरच्या पोलिसांनाही पाचारण करण्यात आल्याने या पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. दिल्ली नाका परिसरात वाहनांना अडविण्यात येत आहे.
बुधवारी सुमारे 200 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. भाजीपाला विक्रेत्यांनाही कडक सूचना देण्यात आल्या. महामार्गावर भाजीपाला विकणार्यांना महसूलच्या पथकाने हुसकून लावले. नागरिकांनी घरातच राहावे यासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत.