दिल्ली l Delhi
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यानं तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यातील राजकीय संघर्ष विकोपाला जात असल्याचं दिसत आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. कोलकत्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला
पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. यावरुन भाजपचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला आहे.
भाजपाचे नेते आणि हरियाणाचे मंत्री अनिल विज यांनी यांनी म्हटलं आहे की, “ममता बॅनर्जी यांच्यासाठी जय श्रीराम म्हणजे वळूला लाल कापड दाखवण्यासारखं आहे. याच कारणामुळे त्यांनी व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये आपलं भाषण थांबवलं” असं विज यांनी म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण ?
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भाषणासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. परंतु, मुख्यमंत्री माईकपाशी येत असतानाच स्टेजच्या जवळ बसलेल्या काही लोकांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी चांगल्याच संतापल्या होत्या.
‘हा सरकारी कार्यक्रम आहे आणि त्याचा सन्मान ठेवला पाहिजे. हा कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सांस्कृतिक मंत्रालयाची आभारी आहे की त्यांनी कोलकातामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं. परंतु, कुणाला कार्यक्रमाला निमंत्रित करून त्याचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. या घोषणाबाजीचा मी निषेध करते आणि काहीच बोलणार नाही. जय हिंद, जय बांगला’ असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी आपला निषेध नोंदवला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते पक्ष सोडून भाजपामध्ये गेले आहेत. अशातच ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. नदिया जिल्ह्यातील शांतीपूरमधील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) आमदार अरिंदम भट्टाचार्य यांनी बुधवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्यासह काही नेत्यांच्या उपस्थितीत अरिंदम यांना पक्षाचं सदस्यत्व देण्यात आलं आहे.