अहमदनगर (प्रतिनिधी) –
निवडणूक लढविण्यास अपात्र का ठरवू नये? अशा आशयाची नोटीस नगर अर्बन बँकेच्या संचालकांना पाठविण्यात आली
आहे. त्यावर 30 दिवसात खुलासा करण्याचा आदेश केंद्रीय निबंधक सत्येंद्रकुमार नायक यांनी दिला आहे. बँकेचे तत्कालीन संचालक दिलीप गांधी यांच्यासह उपाध्यक्ष अशोक कटारिया व इतर 19 संचालकांना ही नोटीस देण्यात आली आहे.
नगर अर्बन बँकेचा वाढलेला एनपीए आणि गैरकारभारामुळे 1 ऑगस्ट 2019 रोजी रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली. ज्या संचालक मंडळाने सहकारी संस्थेत भ्रष्टाचार केला आहे अशा संचालक पुन्हा बँकेत येणार नाहीत. त्यांना निवडणूक लढविता येणार नाहीत. असे धोरण केंद्रीय निबंधकांनी आखलेले आहे.
त्याच अनुषंगाने नगर अर्बन बँकेच्या तत्कालीन संचालकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. नगर अर्बन आणि इतर सहकारी संस्थांवर निवडणुक लढविण्या अपात्र का ठरवू नये? अशी विचारणा नोटीसीत करण्यात आली आहे. त्यावर 30 दिवसात खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आगामी काळात नगर अर्बन बँकेची निवडणूक होण्याची शक्यता असून हे आदेश पारीत झाल्यास दिलीप गांधीसह तत्कालीन संचालकांना बँकेचे दरवाजे कायमचे बंद होणार आहेत. त्यामुळे नगरकरांचे लक्ष आता केंद्रीय निबंधकाच्या आदेशाकडे लागले आहेत.
‘ती’ प्रत गायब
बँकेचे प्रशासक महेंद्रकुमार रेखी यांच्या सहीने ही नोटीस पाठविण्यात आली आहे. या नोटीसमध्ये सेंट्रल रजिस्टर को-ऑप. सोसायटी नवी दिल्ली यांची शोकॉज नोटीस प्रत जोडल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात मात्र ही प्रत देण्यात आली नसल्याची माहिती सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली. केंद्रीय निबंधक कार्यालय किंवा प्रशासक दिशाभूल करत असल्याचा आरोप चोपडा यांनी केला.