नाशिक । प्रतिनिधी
उन्हाची दाहकता वाढली असून ग्रामीण भागात पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये ५४ टक्के जलसाठा आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणात ५० टक्के पाणीसाठा असून अजून कडक उन्हाचे एप्रिल व मे हे दोन महिने काढायचे असल्याने काटकसरीने पाणी वापरावे लागणार आहे.
मार्च अखेरपासून उन्हाची तीव्रता वाढली असून पुढिल दोन महिने तापमानाचा आलेख चढता राहिल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ग्रामीण भागात अद्याप टॅकर जरी सुरु झाले नसले तरी पाणी टंचाई सुरु झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जिल्ह्यातील धरणात ५४ टक्के इतका मुबलक जलसाठा आहे. गतवर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने जवळपास सर्वच धरणे तुडूंब भरुन अोव्हर फ्लो झाली होती. त्यामुळे मार्च अखेर उजाडला तरी धरणांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक जलसाठा शिल्लक आहे.
मात्र, गतवर्षीच्या हा साठा ६० टक्के इतका होता. पुढिल काळात उन्हाची दाहकता वाढणार असल्याने पाण्याच्या वापरात व मागणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. अनेक धरणांतून पिण्यासाठी आवर्तन सोडावे लागणार आहे.तसेच शेती व उद्योगांसाठी ठरल्या नियोजनानूसार आवर्तन सोडावे लागणार आहे. त्यामुळे धरणातील जलसाठयात झपाटयाने घट होणार आहे. ते बघता जिल्हाप्रशासनासमोर उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने नियोजन करावे लागणार आहे.
धरणनिहाय जलसाठा
गंगापूर – ५०
कश्यपी – ७१
गौतमी गोदावरी – ३२
आळंदी – ५८
पालखेड – ७३
करंजवण – ४३
वाघाड – २७
अोझरखेड – ६०
पुणेगाव – ४४
तिसगाव – ४६
दारणा – ६१
भावली – ९१
मुकणे – ६४
वालदेवी – ८५
कडवा – २७
नांदूरमध्यमेश्वर – ८५
भोजापूर – ४२
चणकापूर – ६९
हरणबारी – ५७
केळझर – ४१
नागासाक्या – ३८
गिरणा – ४९
पुनद – ८३
माणिकपूंज – १४