इंदिरानगर । वार्ताहर
येथील इंदिरानगर परिसरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून याबाबत परिसरातील नागरिक यांच्यासह नगरसेविका डाँ दीपाली कुलकर्णी यांनी अनेकदा मनपा प्रशासनाला सांगूनही देखील पाणीपुरवठा सुरळीत होत नव्हता. अखेर महापौर यांना बोलविण्यात आले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश संबंधित पाणी पुरवठा अधिकार्यांना दिले.
परब नगर, बजरंग सोसायटी, श्रद्धा विहार, ब्लू मून सोसायटी, सन्मित्र वसाहत, गणराज कॉलनी, वनसंपदा सोसायटी, गंधर्व नगरी, वन्दना पार्क या या ठिकाणी गेल्या दोन महिन्यापासून कमी दाबाने अनियमित पाणीपुरवठा चालू होता. सातत्याने नगरसेविका डॉ दीपाली कुलकर्णी याचा पाठपुरावा करत होत्या, परंतु अनेक दिवस होऊनही त्याचा काही परिणाम होत नाही म्हणून आज शेवट महापौर सतीश कुलकर्णी यांना बोलविण्यात आले. यावेळी सभागृहनेते सतिश सोनवणे, नगरसेवक अॅड शाम बडोदे देखील उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी महापौरांना तक्रारीत सांगितले की गेल्या दोन ते तीन महिन्यापासून आम्ही सतत नगरसेवीका डॉ. दीपाली कुलकर्णी यांना फोन करीत आहोत.
दीपाली कुलकर्णी देखील अनेक वेळा पाठपुरावा करीत आहेत परंतु पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही तसेच या परिसरात शंभर टक्के पाणी बिलाची वसुली होत असूनही अशी परिस्थिती आहे. पाणीपुरवठ्याचे अधिकारी रवींद्र धारणकर यांना महापौरांनी येत्या दोन दिवसात हा पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आदेश दिले. यावेळी सुनील देसाई , संजय पाखले, प्रकाश जोशी, शिंगणे, गायकवाड, रकिबे, प्रकाश गर्गे, संजय गर्गे, सानप, हरीश कानडे याच्यासह नागरिकांनी आपले गार्हाणे महापौरांसमोर मांडले.