मुंबई | प्रतिनिधी Mumbai
राज्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील प्रगत कृषी तंत्रज्ञान, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ विस्तार आणि उत्पादनवाढीच्या नवीन पद्धतींचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी राबविण्यात येणाऱ्या परदेश दौरा योजनेच्या अनुदानात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. परदेश दौऱ्यासाठी प्रती शेतकरी देण्यात येणारे एक लाख रुपयांचे अनुदान आता दोन लाख रुपये करण्यात आली आहे. कृषी विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला आहे.
जगातील सर्वोत्तम शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी आपल्या शेतात वापरावे यासाठी परदेशी अभ्यास दौऱ्याचे कृषी विभागामार्फत आयोजन केले जाते. २०१२ नंतरच्या काळात प्रवास, निवास आणि परकीय चलनातील दरवाढ लक्षात घेता विद्यमान १ लाख रुपयांच्या मर्यादेत शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळत नव्हती. त्यामुळे अनुदान मर्यादा दुप्पट करून २ लाख रुपये करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शेतीला अत्याधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या निर्णयावर दिली.
राज्यातील शेतकऱ्यांनी या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत अमेरिका, इस्रायल, जपान, ऑस्ट्रेलिया, नेदरलँड्स, फ्रान्स, थायलंड इत्यादी देशांतील शेतीचा अभ्यास केला आहे. शेतीतील नवकल्पना, सिंचन तंत्र, पीक उत्पादन व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आणि निर्यातक्षम शेतीपद्धती याची माहिती शेतकऱ्यांनी परदेश दौऱ्यात घेतली आहे.





