शेती हा व्यवसाय इतर व्यवसायांच्या तुलनेत खूपच अधिक प्रमाणात जोखमीचा आणि तितकाच अनिश्चिततेचा आहे. त्याच बरोबर इतर व्यवसायिक उत्पादनांच्या तुलनेत शेतमालाच्या किंमतीत होणारे चढ-उतार देखील खूपच अधिक प्रमाणात होतात. शेतमाल हा प्रामुख्याने विशिष्ट हंगामात उत्पादित केला जातो. वेगवेगळ्या शेतमालाच्या उत्पादनासाठी लागणारा उत्पादन कालावधी देखील वेगवेगळा असतो.
तसेच शेतमाल हा प्रामुख्याने नाशवंत स्वरूपाचा असल्यामुळे फार काळ शेतमालाचा साठा करून बाजारातील मागणीनुसार शेतीमालाचा पुरवठा करणे व किंमत पातळी स्थिर राखणे अवघड असते. त्यामुळेच शेतमालाला असणारी मागणी आणि शेतमालाचा होणारा पुरवठा यामध्ये नेहमीच असंतुलन निर्माण होते.
या असंतुलनाचा परिणाम म्हणून शेतमालाच्या किंमती कधी-कधी खूपच वाढतात तर कधी-कधी खूपच कमी होतात. त्यामुळे कधी ग्राहक तर कधी शेतकरी अडचणीत सापडतात. ग्राहक अडचणीत सापडला तर जास्त किंमतीचा शेतमाल खरेदी करण्याचे टाळून तो आपली सुटका करून घेऊ शकतो. परंतु शेतमालाच्या किंमतीत कमालीची घट झाल्याने अडचणीत सापडणारा शेतकरी मात्र आपली सुटका करून घेऊ शकत नाही.
कारण असा शेतमाल उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्याने उत्पादन खर्च अगोदरच करून ठेवलेला असतो. आणि योग्य किंमतीत शेतमाल विकल्या शिवाय तो वसूल होणे शक्य नसते. थोडक्यात शेतमालाच्या किंमतीतील चढ-उताराचा मोठा परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाच्या जीवनमानावर आणि पर्यायाने कृषी क्षेत्राच्या विकासावर होत असतो
शेतमालाच्या किंमती मध्ये अशा प्रकारचे चढ-उतार का होतात? आणि कसे होतात? याचा अभ्यास प्रा.निकोलस कॅल्डाॅर यांनी केला. आपणा सर्वांना हे माहित आहेच की जर किंमत कमी असेल तर ग्राहक शेतमालाची साधारणपणे जास्त खरेदी करतो ,परंतु किंमत अधिक असल्यास ग्राहक तुलनेने कमी शेतमाल खरेदी करतो.
याउलट किंमत कमी असलेल्या शेतमालाचे उत्पादन करण्यास शेतकरी नाखूष असतात तर अधिक किंमत असणाऱ्या शेतमालाचे उत्पादन घेण्यास शेतकरी प्राधान्य देतात. थोडक्यात शेतमालाची किंमत हा घटक विचारात घेतला तर ग्राहक आणि शेतकरी यांचे हित एकमेकांच्या विरुद्ध दिशेने असते. म्हणजेच शेतमाल स्वस्त असल्यास ग्राहकांचा लाभ होतो, परंतु शेतकऱ्यांचा तोटा होतो आणि शेतमाल महाग असल्यास शेतकऱ्यांचा फायदा होतो तर ग्राहकांना नुकसान सहन करावे लागते.
शेतमालाची मागणी आणि पुरवठा यांच्या अशा स्वरूपामुळे शेतमालाच्या किंमतीत नेहमी चढ-उतार होत असतात .हे चढ-उतार आकृतीच्या सहाय्याने दाखविण्याचा प्रयत्न केल्यास कोळ्याच्या जाळ्या प्रमाणे आकृती तयार होते. म्हणून या विश्लेषणाला कोळ्याच्या जाळ्याचा सिद्धांत असे नाव पडले.
सर्वसाधारणपणे आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे ? आणि किती प्रमाणात घ्यावे? याचा निर्णय घेतांना शेतकरी इतर अनेक घटकांबरोबर सध्या बाजारात त्या शेतमालाला किती भाव किंवा किंमत मिळते? याचा विचार करतात व ते पीक घेण्याचा निर्णय घेतात.
असाच विचार असंख्य शेतकरी करीत असल्यामुळे सध्या बाजारात ज्या शेतमालाला अधिक किंमत आहे ते पिक आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात घेण्याचा निर्णय अनेक शेतकरी घेतात. अशा पिकांखालील क्षेत्र व त्या पिकांचे उत्पादन हंगामाच्या शेवटी मोठ्या प्रमाणात होते आणि किंमती कमी-कमी होऊ लागतात. अनेक वेळा किंमती इतक्या कमी होतात की शेतकऱ्यांना नफा मिळणे तर दूरच परंतु त्यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघत नाही. किंमतीत झालेली ही कमालीची घट त्या पुढील हंगामात त्या विशिष्ट पिकाचे उत्पादन घेण्यास शेतकऱ्यांना निरुत्साही करते.
त्यामुळे अनेक शेतकरी ते विशिष्ट पीक घेण्याचे टाळतात. म्हणून अशा पिकाखालील क्षेत्र कमी होऊन उत्पादन देखील कमी होते .असे असले तरी शेतमालाला असलेल्या मागणीतील सातत्यामुळे या शेतमालाच्या किंमती पुन्हा वाढू लागतात परंतु उत्पादन व पुरवठा कमी असल्यामुळे किंमती अधिकच वरच्या स्तरावर जातात .या वाढलेल्या किंमती पुन्हा पुढील हंगामात त्या शेतमालाचे उत्पादन घेण्याची प्रेरणा शेतकर्यांमध्ये निर्माण करतात आणि यातूनच शेतमालाच्या किंमती आणि शेतमालाचे उत्पादन यांच्या चढ-उताराचे चक्र निर्माण होते .त्यात असंख्य शेतकऱ्यांचे नुकसान होते तर काही शेतकऱ्यांचा लाभ देखील होतो.
आता प्रश्न असा आहे की, या व्यापार चक्रातून आपली सुटका कशी करता येईल? कृषी उत्पादनाशी संबंधित या व्यापार चक्रातून बाहेर पडणे सर्वच शेतकऱ्यांना नेहमीच शक्य होईल असे नाही. कारण शेतमालाच्या उत्पादनावर किंमती व्यतिरिक्त दुष्काळ, अतिवृष्टी, नैसर्गिक अनुकूलता किंवा प्रतिकूलता, पिकांखालील क्षेत्र, पिकांची उत्पादकता, शेतमालाची आयात-निर्यात इत्यादी सारख्या असंख्य घटकांचा परिणाम होतो.
परंतु असे असले तरी ढोबळमानाने या चक्रातून वाचण्यासाठी एक उपाय निश्चित अवलंबिता येऊ शकतो. तो म्हणजे एखाद्या हंगामात ज्या शेतमालाला अत्याधिक भाव किंवा किंमत आहे तो शेतमाल पुढील हंगामात घेण्याचे टाळावे परंतु एखाद्या शेतमालाच्या किंमती खूपच कमी झालेल्या असतील तर अशा शेतमालाच्या उत्पादनास पुढील हंगामात प्राधान्य द्यावे. कारण किंमत कमी झालेल्या शेतमालाचे उत्पादन घेणारे शेतकरी संख्येने खूप कमी असल्यामुळे बाजारातील पुरवठा बऱ्यापैकी कमी राहून योग्य किंमत मिळण्याची शक्यता अधिक असते.
याशिवाय आपल्याकडे असणाऱ्या शेतीमध्ये एकाच प्रकारचे पीक मोठ्याप्रमाणात घेण्याऐवजी त्या- त्या हंगामातील किमान तीन ते चार प्रकारची पिके घ्यावीत .त्यामुळे एखाद्या पिकामध्ये नुकसान झाले तरी इतर पिकांकडून त्या नुकसानीची भरपाई होऊ शकेल.
– डॉ. मारूती कूसमुडे
(लेखक शेती अर्थशास्त्राचे आभ्यासक आहेत.)