शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी हे साईबाबांच्या महिम्याने पवित्र झालेले स्थळ आहे. येथे श्रद्धा आणि सबुरीचे संस्कार प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेले आहेत. या श्रद्धेचे आणि माणुसकीचे अप्रतिम उदाहरण नुकतेच दिसले. एका सोशल मीडियावरील साध्या संदेशावरून शिर्डी ग्रामस्थांनी काही तासांतच पाच लाख रुपयांची मदत गोळा करून ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांना दिली.
शिर्डी के साईबाबा या ऐतिहासिक चित्रपटातून संपूर्ण जगभर साईबाबांचा संदेश पोहोचविणारे अभिनेते सुधीर दळवी सध्या आजारी असून मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीची आणि आर्थिक अडचणींची माहिती मिळताच शिर्डीतील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. शिर्डीतील ग्रामस्थांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत सर्वांना आवाहन केले. आपण साईबाबांची महती जगभर पोहोचविणार्या या कलाकारावर उपकारांची परतफेड करायला हवी. त्यांच्या या पोस्टला काही मिनिटांतच प्रतिसाद मिळाला.
श्रीरामनवमी उत्सवाच्या निमित्ताने जमा झालेल्या वर्गणीतील साडेचार लाख रुपये तत्काळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उर्वरित पन्नास हजार रुपये ग्रामस्थांनी काही तासांत वर्गणी करून जमा केले. या पुढाकारात शिर्डी गावातील व्यापारी, मंदिर सेवेकरी, महिला मंडळे, ऑटोचालक आणि तरुण मंडळी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येकाने आपल्या परीने देणगी देत आपल्या साईबाबांच्या चित्रपटातील साईबाबा या कलाकारावरील आपली कृतज्ञता व्यक्त केली.
शिर्डी के साईबाबा या चित्रपटाने साईभक्तीचा संदेश सात समुद्रापार पोहोचविला. अभिनेते मनोजकुमार, सुधीर दळवी आणि इतर कलाकारांनी त्या काळात साकारलेली भूमिकांची प्रामाणिकता आजही भक्तांच्या मनात सजीव आहे. साईबाबांचा चमत्कार आणि शिकवण जगभर पोहोचविणार्या या चित्रपटामुळे साई संप्रदायाला जागतिक ओळख मिळाली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
ग्रामस्थांच्या या सामाजिक आणि भावनिक प्रतिसादाचे सर्वत्र कौतुक होत आहे. काही तासांतच पाच लाख रुपयांची मदत जमा होणे ही केवळ देणगी नव्हे तर शिर्डीतील माणुसकीचा जिवंत पुरावा आहे. साईभक्तांच्या मनातील भावनांनी पुन्हा एकदा सिद्ध केले. साईचरणी जोडलेले लोक एकत्र आले तर कोणतेही कार्य अशक्य नाही. या भावनिक उपक्रमानंतर गावभर अभिनेते सुधीर दळवी यांच्या प्रकृतीबद्दल प्रार्थना करण्यात आली. बाबांच्या कृपेने ते लवकर बरे व्हावेत आणि पुन्हा साईबाबांच्या दर्शनाला यावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली. अखेर शिर्डी ग्रामस्थांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि एकता ही खरी साईसेवा आहे. केवळ काही तासात सोशल मीडियावरील संदेशातून जन्मलेली ही मानवतेची लाट साईबाबांच्या उपदेशाचे जिवंत उदाहरण ठरली आहे.





