मुंबई । Mumbai
“माझी लाडकी बहीण योजना ही केवळ घोषणा नसून ती राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे साधन आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, उलट योग्य वेळी या योजनेचा हप्ता १५०० रुपयांवरून वाढवून २१०० रुपये केला जाईल,” अशी महत्त्वाची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी (३ फेब्रुवारी २०२६) रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. चिपळूणमधील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महिलांना मोठा दिलासा दिला.
या योजनेच्या अंमलबजावणीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले की, “लाडकी बहीण योजना ही माझी सर्वात आवडती आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. दरवर्षी या योजनेवर सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा मोठा खर्च येत असतानाही, ही योजना सुरू ठेवणे हे सरकारचे धाडसाचे पाऊल होते. सुरुवातीला अनेकांनी यावर टीका केली, मात्र ही योजना महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणत आहे.”
एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, महायुती सरकारचे मुख्य उद्दिष्ट राज्याचा विकास आहे. “आम्ही राबवलेल्या सर्वच योजनांमध्ये ८० टक्के समाजकारण आणि केवळ २० टक्के राजकारण आहे. मला कोणावरही टीका करायची नाही, कारण आमचा अजेंडा केवळ विकास हाच आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांप्रमाणेच शेतकऱ्यांनाही सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, अलीकडेच सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसमावेशक असून त्यामध्ये समाजातील सर्व घटकांचा विचार करण्यात आल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सभेला मोठी गर्दी असून महिलांचा उत्साह पाहून शिंदे यांनी भविष्यात या योजनेतून अनेक यशस्वी उद्योजिका समोर येतील, असा विश्वास व्यक्त केला.





