मुंबई | Mumbai
पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिलाच दिवस वादळी ठरल्याचे दिसून आले. यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरले ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे सेनेचे आमदार निलेश राणे यांच्यात जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. राज्यात चड्डी बनियन गँगचे काहीही सुरू आहे, युतीधर्मामुळे मुख्यमंत्र्यांना त्यावर कारवाईही करता येत नाही अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. त्यानंतर निलेश राणे यांनी विधानसभेतून हा शब्द काढून टाकण्याची मागणी केली, तसेच आदित्य ठाकरेंवर टीकादेखील केली.
आमदार आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत नियम 293 अन्वये प्रस्तावावर बोलताना सत्ताधाऱ्यांवर अनेक विषयांवरून टीका केली. भाषणाचा शेवट करताना त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावताना शिंदे गटावर चड्डी बनियन गँग अशी टीका केली. त्याला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे चांगलेच भडकले. तुमच्यात जर हिंमत असेल तर नाव घ्या, नाहीतर सभागृहात असले शब्द वापरायचे नाहीत असे निलेश राणे म्हणाले.
आदित्य ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना युतीधर्म पाळणे गरजेचे असल्याने त्यांना काही गोष्टी सहन कराव्या लागतात. ज्या लोकांसोबत ते बसलेत ते चड्डी बनियन गँग ते कुणालाही मारतात, काहीही करतात. पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे कौतुक याच्यासाठी करतो की त्यांनी मोठी सहनशिलता दाखवली. ते कुणावरही कारवाई करत नाहीत. मात्र सध्या राज्यात जे सुरू आहे, मुंबईत जे सुरू आहे त्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. चड्डी बनियन गँगवर कडक कारवाई करावी आणि शासन काय असते ते दाखवून द्यावे असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले.
आदित्य ठाकरेंच्या या टीकेवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला. “त्यांनी हे जे काही शब्द वापरले, त्यांनी नेमकी कोणावर कारवाई व्हावी हे सांगावे. नेमके चड्डी कोण आणि बनियन कोण हे त्यांनी सांगावे. जर नाव घ्यायला भीती वाटत असेल तर सभागृहात असे शब्द वापरू नयेत. जर हिंमत असेल तर ते शब्द कुणासाठी होते हे सांगावे. उगाच टीका करायची म्हणून काहीही बोलला का?” असे म्हणत निलेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना थेट आव्हान केले. दरम्यान, सध्या त्यांच्या या वादाची चांगलीच चर्चा होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




