मुंबई | Mumbai
राज्य सरकारचे स्वच्छता मॉनिटर नावाचे अभियान चालवणाऱ्या रोहित आर्या एन्काऊंटर प्रकरणात आता नवनवीन माहिती समोर येत आहे. सरकारने दोन कोटीहून अधिकची थकबाकी न दिल्याने रोहित आर्याने १७ मुलांना ओलीस ठेवले होते. आपल्याला तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलायचे असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, त्या आधीच दहशतवाद विरोधी पथकाने रोहित आर्याचे एन्काऊंटर केले. दरम्यान, या एन्काऊंटवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. रोहित आर्याचा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केला आहे.
ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी पोलिसांवर आरोप केला आहे की, पोलिसांना रोहित आर्या याच्या हात किंवा पायावर गोळी मारणे शक्य होते. मात्र, एपीआय अमोल वाघमारे यांना हिरो व्हायचे असल्याने त्यांनी रोहित आर्य याच्या छातीत गोळी मारुन त्याला ठार केले, असा खळबळजनक आरोप अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी केला. रोहित आर्या याला गोळी मारुन ठार मारण्याऐवजी दुसरा काही उपाय नव्हता का, असा सवाल अॅडव्होकेट नितीन सातपुते विचारला. शिवाय या संदर्भात चौकशी व्हावी, यासाठी कोर्टात जाणार असल्याचे देखील ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी सांगितले.
पोलिसांनी आर्याच्या पायावर गोळी झाडायला हवी होती. पण पोलिसांनी त्याच्या छातीत गोळी मारली. या अपहरणासाठी राज्य सरकार पूर्णपणे जबाबदार आहे. राज्य सरकारने त्याची दोन कोटींची फसवणूक केली. त्याची अधिकृत देयके न दिल्याने आर्या प्रचंड आर्थिक तणावात होते. पोलीस यंत्रणेचे अपयश लपवण्यासाठी ही चकमक घडवली, असा दावाही सातपुते यांनी केला.
नितीन सातपुतेंनी प्रश्न उपस्थित केले
रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना डीसीपी दत्ता नलावडे हे रोहित आर्या याच्याशी बोलत होते. पोलिसांना रोहित आर्या याची पार्श्वभूमी माहिती झाल्यानंतर त्यांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क का साधला नाही? ते केसरकरांच्या संपर्कात होते तर पोलिसांनी रोहित आर्या याला दीपक केसरकर यांच्याशी का बोलून दिले नाही? मुंबई पोलिसांनी टोकाचे पाऊल का उचलले? रोहित आर्या याने मुलांना ओलीस ठेवले. पण त्यासाठीची परिस्थिती सरकारने निर्माण केली. हा प्रसंग टाळता आला असता. रोहित आर्या याने त्याच्या सरकारी कामाचे पैसे मिळवण्यासाठी उपोषण केले. मात्र, सरकारने त्याला पैसे दिले नाहीत. रोहित आर्या हा दहशतवादी नव्हता, सरकारचीच कामे करत होता मग तुम्ही त्याला वाचवले का नाही, असा सवाल अॅडव्होकेट नितीन सातपुते यांनी उपस्थित केला.
रोहित आर्या याच्या अनेक मागण्या सरकारच्या आडमुठे भूमिकेमुळे अपुऱ्या राहिल्या. रोहित आर्याचे पैसे थकीत होते, म्हणूनच त्यांनी टोकाची भूमिका घेतली. मुलांना बंधक बनवणे ही कृती चुकीची आहे. या एन्काऊंटर बाबत चौकशी करण्यासाठी रीट याचिका दाखल करावी लागणार आहे, असेही सातपुते म्हणाले. शिवाय पोलीस आयुक्तांनी एअरगनबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही, असेही ते म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





