संगमनेर (वार्ताहर) – कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यभर परीक्षेच्या संदर्भात साशंक वातावरण आहे. त्यामुळे माध्यमिक स्तरावरील नववी व अकरावीचे वार्षिक मूल्यमापन व दहावीचा भूगोलाचा पेपर यासंदर्भातील अंतिम निर्णय 15 एप्रिल नंतर घेण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.
कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी राज्य शासनाच्या वतीने प्राथमिक स्तरावरील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
त्यामुळे इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा होणार नाहीत. मात्र माध्यमिक स्तरावरील इयत्ता नववी व अकरावीच्या वार्षिक परीक्षा संदर्भाने शासनाकडे वारंवार विचारणा होत असल्यामुळे सदर परीक्षेच्या संदर्भातील निर्णय भारतातील लॉक डाऊन उठल्यानंतर म्हणजे 15 एप्रिल नंतर घेण्यात येणार आहेत.
तर इयत्ता दहावीचा भूगोल विषयाचा राहिलेला पेपर संदर्भातील निर्णय देखील 15 एप्रिल नंतरच घेण्यात येणार आहेत. दरम्यान इयत्ता दहावीचे पेपर तपासणीसाठी घरी नेण्यास संदर्भाने अनुमती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदरचे पेपर शिक्षक घरी नेऊ शकणार आहेत. त्याची अंमलबजावणी लॉक डाऊनच्या समाप्ती नंतरच होऊ शकेल अशा स्वरूपाचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे .