नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू आणि काश्मिरच्या पहलगाममध्ये दहतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारत अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २८ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अवघ्या २४ तासांत बारामुल्लामध्ये दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी आणि सुरक्षा दलात तुंबळ चकमक उडाली असून या चकमकीत आत्ता पर्यंत दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले आहे. दरम्यान, ही चकमक अद्याप सुरू असल्याची माहिती लष्कराकडून देण्यात आली आहे.
बारामुल्लामध्ये ३ दहशतवाद्यांनी घुसखोरी करणाऱ्या प्रयत्न केला असता यातील दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. जवानांनी या कारवाईत दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्रं, दारुगोळा, आणि अन्य सामग्री जप्त केली आहे. चिनार पोलिस-इंडियन आर्मी एक्स हँडलने एका पोस्टमध्ये या कारवाईची माहिती दिली. जवानांनी पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
याबाबत, अधिक माहिती अशी की, ‘२३ एप्रिल रोजी बारामुल्ला येथील ऊरी नाल्यातील सरजीवनच्या सामान्य भागातून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी, २ ते ३ दहशतवाद्यांनी घुसखोरीचा प्रयत्न केला. यावेळी त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी त्यांना रोखले आणि चकमक सुरू झाली. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला असून सध्या चकमक सुरु आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा