अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
यंदा देशात 24 मे रोजी मान्सून केरळ व कर्नाटकात या ठिकाणी एकाच वेळी दाखल झाला. त्यानंतर त्याने देशभर 113 दिवस हजेरी लावून रविवारपासून (दि.14) राजस्थानच्या वाळवंटी, मारवाड भागातील श्रीगंगानगर, बिकानेर, नागौर, फालुदी, जैसलमेर, जोधपूर, बारमेर जिल्ह्यांच्या भागातून माघारीचा प्रवास सुरू केला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला असला अजून महिनाभर महिनाभर देशात मान्सूनच्या पावसाचा मुक्काम राहणार आहे.
याबाबत पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, यंदा तीन दिवस आधीच देश पातळीवरून परतीच्या पावसाला सुरूवात झाली असली तरी अजून पुढील महिनाभर देशात परतीचा प्रवास सुरू राहणार आहे. साधारण 15 ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस सरासरी तारखेदरम्यान देशातून निघून जाईल आणि दक्षिणेकडील चार राज्यात तो ईशान्य मान्सून म्हणून तो स्थिरावेल. दरम्यान, रविवारपासून पुढील पाच दिवस म्हणजे गुरुवार (दि. 18) पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यातही आज सोमवार (दि.15) राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवमान विभागाच्यावतीने आज जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अर्लट जाहीर केला आहे.
नेवासा, शेवगाव, कर्जत, नगरमध्ये दमदार पाऊस
जिल्ह्यात शनिवारी सांयकाळी ते रविवारी सकाळपर्यंत कापूरवाडी 41, केडगाव 42, भिंगार 30, नागापूर 45, जेऊर 43, राशीन 142, भांबोरा 50, कुंभळी 45, मिरजगाव 48, माहिजळगाव 68, कुळधरण 45, वालवड 79, खेड 50, कोरेगाव 79, आरणगाव 68, पाटोदा 43, शेवगाव 74, भातकूडगाव 58, बोधेगाव 102, एरंडगाव 80, दहिगावने 80, मुंगी 88, पाथर्डी 67, माणिकदौंडी 67, टाकळीमानूर 88, कोरडगाव 87, करंजी 47, मीरी 67, तिसगाव 55, खरंडीकासार 88, अकोला 87, नेवासा खु. 53, नेवासा बू. 48, कुकाणा 50, सोनई 44, वडाळा 53, देडगाव 50, ब्राम्हणी 44, वांबोरी 36 मिली मीटर असा पाऊस झालेला आहे.




