अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यातील सहकारी व खासगी अशा एकूण 22 पैकी 19 साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांकडून आत्तापर्यंत 31 लाख 14 हजार 146 मे. टन गाळप व 22 लाख 61 हजार 318 क्विंटल साखर पोती उत्पादन झाले. यंदा कुकडी व केदारेश्वर हे दोन सहकारी साखर कारखाने आणि साईकृपा देवदैठण हा खासगी कारखाना अद्याप सुरू झालेला नाही.
उर्वरित कारखान्यांचा हंगाम सुरू झाला. यापैकी 10 कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली. पद्श्री विखे पाटील व गंगामाई यांनी 2950 रु. तर 8 कारखान्यांनी 3 हजार रु. पहिली उचल देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, 9 कारखान्यांकडून अद्यापही ऊसदर जाहीर करण्यात आलेला नाही.
जिल्ह्यातील पद्श्री विखे पाटील कारखान्याने 2956 रुपये, गंगामाई कारखान्याने 2950 रुपये उचल जाहीर केली. तर अगस्ती, कर्मवीर काळे, अशोक, वृद्धेश्वणर, सहकारमहर्षी थोरात, लोकनेते घुले, प्रसाद शुगर, मुळा प्रत्येकी 3,000 रुपये पहिली उचल जाहीर केली. आतापर्यंत कोल्हे कारखान्याने 96 हजार 977 मे. टन ऊस गाळप व 63 हजार 250 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. तर पद्श्री विखे पाटील कारखान्याने 2 लाख 13 हजार मे. टन गाळप करून 1 लाख 31 हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. बारामती अॅग्रोने 96 हजार 372 मे. टन गाळप करून 83 हजार 170 क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.




