अहिल्यानगर | सचिन दसपुते
येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर (अहमदनगर) महानगरपालिकेतील प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे. मागील निवडणुकीत ज्या पध्दतीने प्रभाग रचना करण्यात आली होती, त्याच धर्तीवर यंदाही प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे 17 प्रभागांमध्ये प्रत्येकी 4 नगरसेवक निवडून येणार असून, एकूण 68 नगरसेवकांची निवड केली जाणार आहे. प्रभागांच्या सीमारेषा कशा प्रकारे आखल्या जातात, याकडे इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे. एखाद्या भागातील मतदारांचे गट्ठे दुसर्या प्रभागात गेले, तर काही इच्छुक उमेदवारांची अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे काही भाग वगळणे, काही भाग जोडणे यासाठी स्थानिक राजकीय नेते प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. दुसरीकडे, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक भावी नगरसेवकांनी आपल्या संभाव्य प्रभागात सक्रीयपणे लक्ष घालण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या पाच-सहा वर्षांत नगरच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या असून, त्याच पार्श्वभूमीवर यंदाची महापालिका निवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नगर मनपाची शेवटची निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये पार पडली होती. त्यावेळी शिवसेना-भाजप युती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी समोरासमोर होत्या. त्या निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यामध्ये शिवसेनेचे 23, भाजपाचे 15, राष्ट्रवादीचे 19, काँग्रेसचे 5, बहुजन समाज पक्षाचे 4, समाजवादी पक्षाचा 1 आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला होता. मात्र, शिवसेनेचा महापौर होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिला आणि भाजपकडून महापौर-उपमहापौर झाले. मात्र, राष्ट्रवादीने बाबासाहेब वाकळे यांना भाजप महापौर पदासाठी पाठिंबा दिल्याने त्यावेळी जानेवारी 2019 मध्ये राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक व तीन पदाधिकारी मिळून 22 जणांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली होती. पुढे लोकसभेची निवडणुक असल्याने चार महिन्यात हे निलंबन मागे घेतले होते. त्यानंतर अडीच वर्षांत राज्यात राजकीय उलथापालथ झाली. शिवसेना-भाजप युतीत फाटाफूट झाली आणि महाविकास आघाडीच्या (शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस) रूपाने नवीन सत्तास्थापना झाली. महापालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरला. शिवसेनेला महापौर व राष्ट्रवादीला उपमहापौर पद देण्यात आले. रोहिणी शेंडगे या महापौर झाल्या होत्या. परंतु कालांतराने शिवसेना तुटली आणि राष्ट्रवादी काँग्रेसही दोन गटांत विभागली गेली. सध्या राज्यात भाजप, शिंदे गट व अजित पवार गट अशी महायुती सत्तेत आहे, तर शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेस विरोधात आहेत. स्थानिक निवडणुकांमध्ये महायुती व महाविकास आघाडीचे एकत्र लढण्याची शक्यता कमीच असल्याने नगरमध्ये तितकाच स्वतंत्र लढा होईल, असे दिसत आहे.
महायुतीमध्ये भाजप आणि आमदार संग्राम जगताप यांच्याकडील राष्ट्रवादी गट यांची ताकद वाढली आहे. दुसरीकडे शिंदे गटात अनेक ठाकरे गटातील पदाधिकार्यांनी प्रवेश केल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तिकिट वाटपावरून ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. त्याउलट, महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्षच सध्या रिक्त आहे. ठाकरे गटातूनही अनेकांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्यामुळे त्यांची अवस्था कमकुवत झाली आहे. शरद पवार गटाकडेही विशेष ताकद नाही. परिणामी, या निवडणुकीत सहा प्रमुख पक्षांत महापौर पदासाठी मोठी चढाओढ होणार आहे.
निवडणूक गाजणार, तिकिट वाटपावरून डोकेदुखी वाढणार
महापालिकेतील कारभार, पाणी प्रश्न, रस्त्यांची दुर्दशा, अतिक्रमण, तसेच विकासकामांमधील अपारदर्शकता या मुद्द्यांवर ही निवडणूक गाजण्याची शक्यता आहे. यंदाच्या निवडणुकीत नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, प्रभागांची नवीन रचना व सामाजिक समीकरणे निर्णायक ठरणार आहेत. महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये तिकिट वाटपावरून मोठा पेच निर्माण होणार आहे. अनेक इच्छुकांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केल्याने नेतृत्वासमोर डोकेदुखी वाढली आहे.
शहरवासीयांची अपेक्षा
शहरातील नागरिकांनी मागील काही वर्षांत विविध समस्या भोगल्या आहेत. यामध्ये पाणीटंचाई, अनियमित कचरा व्यवस्थापन, खराब रस्ते, अतिक्रमण आणि पर्यावरणस्नेही उपाययोजनांचा अभाव. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदार अधिक जागरूक झाले आहेत. विकासकामांना प्राधान्य देणार्या उमेदवारांना मतदार पसंती देण्याची तयारी दाखवत आहेत. अनेक संभाव्य उमेदवारांनी आपापल्या प्रभागात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला असला, तरी मतदार आता पक्षापेक्षा कामाला प्राधान्य देण्याची मानसिकता ठेवून मतदान करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.