अकोले | प्रतिनिधी | Akole
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावातील शूर व धाडसी भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर यांनी जम्मू-काश्मीर येथे भारतीय सैन्याच्या 17 राष्ट्रीय रायफल्स युनिटमध्ये सेवा बजावत असताना देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. 15 मराठा लाईट इन्फंट्री या प्रतिष्ठित सैन्य बटालियनचे ते धडाडीचे जवान होते.
दिनांक 22 मे रोजी जम्मू-काश्मीरमध्ये सुरु असलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत त्यांनी अत्यंत धैर्याने आणि शौर्याने सामना करताना वीरमरण पत्करले. त्यांच्या या अपार त्यागाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका, अहिल्यानगर जिल्हा आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे. संदीप गायकर हे 2014 साली भारतीय सैन्यात भरती झाले.
लष्करातील सेवा काळात त्यांनी अनेक दुर्गम आणि अत्यंत कठीण परिस्थितीत देशसेवा बजावली. ते अत्यंत शिस्तप्रिय, समर्पित आणि राष्ट्रभक्त जवान म्हणून परिचित होते. त्यांच्या सहकार्यांमध्ये आणि वरिष्ठ अधिकार्यांमध्ये त्यांचा विशेष सन्मान होता.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
संदीप गायकर यांचे वय 32 वर्षे होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दीड वर्षांचा मुलगा, वडील पांडुरंग गायकर, आई, आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातील प्रत्येकजण या दु:खात सहभागी आहे.
गावात दुःखवटा आणि बंदची घोषणा
त्यांच्या निधनामुळे ब्राम्हणवाडा गावात 23 ते 27 मे पर्यंत (पाच दिवस) दुःखवटा पाळण्यात येणार आहे. या काळात गावातील सांस्कृतिक कार्यक्रम, लाऊडस्पीकर, मिरवणुका यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच, 23 आणि 24 मे रोजी गावातील सर्व दुकाने (अत्यावश्यक सेवा वगळता) बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अंत्यविधीची माहिती
संदीप गायकर यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन 24 मे रोजी सकाळी 9 वाजता त्यांच्या राहत्या घरी आनंददरा, ब्राम्हणवाडा येथे त्यांच्या कुटुंबीयांसाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या पार्थिवाची ग्रामप्रदक्षिणा होणार असून सकाळी 10 वाजता सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा मैदानावर त्यांच्या शासकीय इतमामात अंत्यविधीचा कार्यक्रम होईल.
गावाच्या आणि राष्ट्राच्यावतीने श्रद्धांजली
ग्रामपंचायत ब्राम्हणवाडा, सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य, ग्रामस्थ, व्यापारी संघटना आणि संपूर्ण अकोले तालुक्याच्या वतीने वीर जवान संदीप गायकर यांना अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांच्या शौर्याचा इतिहास गावाच्या आणि देशाच्या स्मरणात सदैव जिवंत राहील.





