Friday, September 20, 2024
Homeनगरउद्यापासून २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया; नगर जिल्ह्यात ३ हजार २३ जागांसाठी...

उद्यापासून २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया; नगर जिल्ह्यात ३ हजार २३ जागांसाठी ‘इतके’ अर्ज

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

न्यायालयाच्या निकालानंतर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आरटीई अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सोडतीची निवड यादी जाहीर झाली आहे. त्यानुसार सोमवार (दि.२२) जुलैपासून या सोडतीद्वारे निवड झालेल्या बालकांच्या पालकांना त्यांनी नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर संदेश येण्यास सुरुवात होईल. दरम्यान, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रखडलेली ही प्रवेश प्रक्रिया उद्या २३ जुलैपासून सुरू होणार असल्याने २५ टक्के मोफत प्रवेशाची वाट पाहणाऱ्या पालक आणि विद्यार्थी आता सुटकेचा निःश्वास टाकणार आहेत.

दरम्यान, नगर जिल्ह्यात २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ३२७ शाळा पात्र असून याठिकाणी ३ हजार २६ जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव आहेत. याठिकाणी ९ हजार ६२६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातून ऑनलाईन सोडत पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड होणार आहे. मात्र, गेल्या तीन ते चार महिन्यांपासून न्यायालयीन प्रक्रियेमुळे ही मोफत प्रवेशाची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आजपासून ही प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

हे ही वाचा : तुमचा भंपकपणा आम्ही उघडा करणार; भाजपच्या दरेकरांचा जरांगेंना इशारा

यंदा ही मोफत प्रवेश प्रक्रिया न्यायालयात अडकली होती. फेब्रुवारी महिन्यांत शिक्षण विभागाने या मोफत प्रवेशाबाबत सुधारित आदेश काढले होते. या आदेशा विरोधात उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपिठात जनहित याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर ११ जुलैला अंतिम सुनावणी होवून शुक्रवार (दि. १९) रोजी अंतिम निकाल न्यायालयाने दिला आहे.

त्यानूसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या सोडतीची निवड व प्रतीक्षा यादी शनिवारी (दि. २०) प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर आजपासून मोफत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएस येणार आहेत. हे एसएमएस मिळणाऱ्या पालकांनी त्यांच्या पाल्याची निवड झालेल्या शाळेत २३ ते ३१ जुलैदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करून आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी केले आहे.

यंदाचे शैक्षणिक वर्ष १५ जूनला सुरू झाले. त्यालाही आता महिना होत आला. त्यामुळे नियमित प्रवेशप्रक्रिया उरकून वर्गही सुरू झाले आहेत. दुसरीकडे आरटीई प्रवेशप्रक्रियेत आपल्या पाल्याला संधी मिळेल, या आशेने अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे प्रवेश अद्याप कोठेही घेतलेले नाहीत. पाल्याची प्रवेशाची संधी दोन्हींकडूनही हुकली तर त्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाईल, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. येत्या आठ दिवसांत २५ टक्क्यांनुसार संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा नवा प्रश्न उभा राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

शिक्षण विभागाने काढलेल्या आदेशात प्रवेश मिळाल्याचा संदेश प्राप्त झालेल्या पालकांनी संकेतस्थळावरून प्रवेश पत्राची प्रिंट घ्यावी. प्रवेशपत्रावर दिलेल्या संबंधित पडताळणी समितीकडे आवश्यक कागदपत्रे आणि त्यांच्या छायांकित प्रती घेऊन जावे. समितीने प्रवेश निश्चित केल्यानंतर पालकांनी प्रत्यक्ष प्रवेशासाठी शाळेत जाणे आवश्यक आहे. तसेच, पालकांनी केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता संबंधित संकेतस्थळावर अर्जाची स्थिती या टॅबवर आपल्या पाल्याचा अर्ज क्रमांक टाकून त्याचा प्रवेश निश्चित झाला आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

तालुकानिहाय आलेले अर्ज

अकोले २९३, जामखेड २०१, कोपरगाव ६५०, कर्जत २५०, नगर १ हजार ३९, नेवासा ६३४, पारनेर ४५६, पाथर्डी ३१०, राहुरी ५६४, राहाता १ हजार २६४, शेवगाव ४२२, संगमनेर ९६१, श्रीगोंदा २१२, श्रीरामपूर ७७४, नगर ८९९ असे आहेत.

दरम्यान, न्यायालयात दाखल याचिकेवर राज्यातील काही शिक्षण संस्थांनी हस्तक्षेप याचिका दाखल करत काही जागा शासनाच्या ९ फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र, न्यायालयाच्या निकालानुसार आता प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचा हक्क अबाधीत ठेवण्यात येत २५ टक्क्यांनुसार वंचित आणि दुर्बल घटकांमधील विद्यार्थ्यांना स्वतंत्रपणे प्रवेश देण्यास सांगितले आहे. तसेच यामुळे वर्गाच्या प्रवेश क्षमतेपक्षा अधिक विद्यार्थी होणार असतील तर याबाबत शिक्षण विभागाला कळवून हे प्रवेश नियमित करून घेण्यास सांगितले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या