Friday, May 3, 2024
Homeनगरनगर जिल्ह्याच्या 14 तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी दोन मीटरने वाढ

नगर जिल्ह्याच्या 14 तालुक्यांतील भूजल पातळीत सरासरी दोन मीटरने वाढ

नेवासा | Newasa

भूजल सर्वेक्षण विभागाने नगर जिल्ह्यातील भूजल पातळीचा अभ्यास केला असता अकोले, राहाता, राहुरी, संगमनेर नेवासा, श्रीरामपूर व श्रीगोंदा या 7 तालुक्यांमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळीत एक मीटर पर्यंत वाढ झाल्याचे दिसून आले. जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, पारनेर या 5 तालुक्यांमध्ये 2 मीटरची तर पाथर्डी व शेवगाव या 2 तालुक्यांमधील भूजल पातळीत 2 ते 3 मीटरपर्यंत वाढ आढळून आली.

- Advertisement -

नगर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रश्मी कदम व अजिंक्य काटकर यांच्या पथकाने सप्टेंबर 2022 अखेरच्या जिल्ह्यातील भूजल पातळीचा अभ्यास करून सन 2022-23 चा संभाव्य टंचाई सदृश परिस्थितीचा अहवाल तयार केला आहे.

यासाठी महाराष्ट्र भूजल अधिनियम 2009 अन्वये दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार अहमदनगर जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा टंचाई परिस्थितीचा अहवाल तयार करणेसाठी अस्तित्वात असलेल्या निरीक्षण विहीरीची भूजल पातळी व झालेले पर्जन्यमान यांचा सखोल अभ्यास करण्यात आला. प्रत्येक पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींची माहे सप्टेंबर 2022 मान्सून अखेर भूजल पातळी व त्या निरीक्षण विहिरींची गेल्या पाच वर्षांतील सरासरी पातळी यांचा तुलनात्मक अभ्यास पाणलोट निहाय व तालुकानिहाय करण्यात आला. सप्टेंबर 2022 पर्जन्यमानाचा सरासरी पर्जन्यमानाशी तुलनात्मक अभ्यास करून त्याची तुलना भूजल पातळीशी करण्यात आलेली आहे.

या वर्षी जिल्ह्यात सप्टेंबर 2022 चे सरासरी पर्जन्यमान 448.53 मिलीमीटरच्या तुलनेत 572.28 मिलीमीटर झाले असून 27.58 टक्के वाढ दिसून येते व त्याचा भूजल पातळीवर परिणाम झालेला दिसून येतो. जिल्ह्यात पाथर्डी तालुक्याच्या पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत 01 ते 10 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यामध्ये पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत 10 ते 20 टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. तर 20 ते 50 टक्के वाढ झालेल्या तालुक्यामध्ये संगमनेर, कोपरगाव, राहाता, राहुरी, नेवासा, नगर, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत या 10 तालुक्यांचा समावेश आहे. तर 50% पेक्षा जास्त पर्जन्यमान झालेला तालुका अकोले हा आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांतील पर्जन्यमानात वाढ आढळून येते तर जामखेड तालुक्यात 16% घट आढळून आली आहे. सदरची घट ही ऑक्टोबर अखेरीस झालेल्या परतीच्या पर्जन्यमानात भरून निघाली आहे.

जिल्ह्यातील भूजल पातळीचा अभ्यास केला असता, अकोले, राहाता, राहुरी, संगमनेर नेवासा, श्रीरामपूर व श्रीगोंदा या सात तालुक्यांमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत 01 मीटर पर्यंत वाढ दिसून येते. तसेच जामखेड, कर्जत, कोपरगाव, नगर, पारनेर, या पाच तालुक्यांमध्ये 1 ते 2 मीटरची वाढ दिसून येते, तसेच पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांमध्ये 2-3 मीटरपर्यंत वाढ आढळून आली आहे.

जिल्ह्यात सिंचनासाठी अधिक भूजलाचा उपसा झाल्यास काही गावांमध्ये तसेच पठारी वाड्या वस्त्यांमध्ये मार्च अखेरीस टंचाई सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही गावे धरणाच्या कालव्याच्या प्रभाव क्षेत्रातील आहेत, सदर गावांत कालव्यातून सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या नियमित आवर्तनांचा परिणाम भूजल पातळीवर आगामी काळात होऊ शकतो.

जिल्ह्यातील 202 निरीक्षण विहीरीतील प्रत्येक विहिरीची माहे सप्टेंबर 2022 मधील सरासरी भूजल पातळी मागील 5 वर्षांतील त्याच कालावधीतील सरासरी स्थिर भूजल पातळी यांची तुलना करून भूजल पातळीतील घट काढण्यात आली आहे.

जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पर्जन्यमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. माहे ऑक्टोबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी मार्च 2020 पर्यंत टंचाई भासण्याची शक्यता राहणार नाही.

भूजल अधिनियमातील मार्गदर्शक तत्वे व सूचना यांचे पालन करून सप्टेंबर 2022 अखेर पर्जन्यमान व सप्टेंबर- ऑक्टोबर 2022 मध्ये घेतलेल्या निरीक्षण विहिरीच्या भूजलाची पाण्याची पातळीच्या आधारे येणार्‍या उन्हाळी हंगामातील संभाव्य पाणी टंचाईचा अहवाल तयार करण्यात आलेला आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान मिलीमिटरमध्ये

तालुका सरासरी जून ते वाढ/

पर्जन्य सप्टें 22 घट %

अकोले 488.4 886.8 81.6

संगमनेर 351.2 524.3 49.3

श्रीरामपूर 463.1 527.1 13.8

कोपरगांव 404.2 605.8 49.9

राहुरी 431.7 555.7 28.7

नेवासा 429.7 554.5 29.0

शेवगाव 463.8 558.8 20.5

पाथर्डी 473.1 487.4 3.0

पारनेर 414.4 553.1 33.5

श्रीगोंदा 402.9 166.4 41.3

कर्जत 447.4 570.7 27.6

जामखेड 576.1 485.6 -15.7

नगर 479.8 581.1 21.1

राहाता 454.0 551.7 21.5

सरासरी 448.6 572.3 28.9

- Advertisment -

ताज्या बातम्या