Saturday, October 5, 2024
Homeनगरकचरा संकलन करणार्‍या संस्थेची सहा कोटींची बिले थकली

कचरा संकलन करणार्‍या संस्थेची सहा कोटींची बिले थकली

कोणत्याहीक्षणी कचरा संकलन बंद करण्याचा इशारा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या वर्षभरापासून शासनाने वित्त आयोगाचे अनुदान दिलेले नाही. महापालिकेची कर वसुलीही ठप्प झाल्याने मनपाकडेही पैसे नाहीत. परिणामी, शहरात कचरा संकलन करणार्‍या श्रीजी एजन्सी या संस्थेची पाच महिन्यांपासून सहा कोटी रुपयांची बिले थकली आहेत. दरम्यान, आर्थिक अडचणीमुळे काम सुरू ठेवणे शक्य नाही. कर्मचार्‍यांचे पगार थकले आहेत. तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास कोणत्याही क्षणी शहरातील कचरा संकलनाचे काम बंद करणार असल्याचे ठेकेदार संस्थेने स्पष्ट केले आहे. शहरात सध्या 80 गाड्यांव्दारे घरोघरी, हॉटेलमधून, कचरा कुंड्यांमधून कचरा संकलन केले जाते.

- Advertisement -

या कामाची जानेवारी ते मे महिन्याची बिले थकली आहेत. अद्यापही सहा कोटींची बिले थकीत असल्याने कचरा संकलन व्यवस्थेवर, कर्मचार्‍यांच्या पगारावर होणारा दैनंदिन खर्च होऊ शकत नाही. बँकांचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे 10 जून रोजी कर्मचार्‍यांनी काम बंद केले होते. त्यांची समजूत काढून काम सुरू केले आहे. मात्र, तत्काळ थकीत बिले न मिळाल्यास शहरातील सर्व कचरा संकलन सेवा बंद पडेल, असे श्री जी एजन्सीच्यावतीने मनपाला कळवण्यात आले आहे. दरम्यान, मनपाकडे पर्यायी व्यवस्था नसल्याने शहरात कचरा संकलन ठप्प होऊन कचरा कोंडी होण्याची शक्यता आहे.

सध्या श्री जी एजन्सीकडून नगर कचरा संकलन केले जात असले तरी काही भागात वेळेवर कचरा गाड्या घेत नाहीत. पर्यायाने कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ नागरिकांवर येते. सावेडीतील निर्मलनगर, शिवनगर, गावडे मळा आदी परिसरात वेळेवर गाड्या येत नसल्याने नागरिक कचरा रस्त्यावर टाकतात. सध्या पावसाचे दिवस असल्याचे रस्त्यावरील कचर्‍याची दुर्गंधी सुटते.

- Advertisment -

ताज्या बातम्या