Thursday, July 4, 2024
Homeनगरनगर पोलीस दलात उद्यापासून भरती प्रक्रिया

नगर पोलीस दलात उद्यापासून भरती प्रक्रिया

64 जागांसाठी 5 हजार 970 उमेदवार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर जिल्ह्यात पोलिस भरती प्रक्रिया बुधवारपासून (दि. 19) सुरू होणार आहे. जिल्हा पोलीस दलातील रिक्त असलेल्या 25 पोलिस हवालदार व 39 चालक अशा 64 जागांसाठी ही प्रक्रिया पार पडणार आहे. यात 19 ते 27 जून या कालावधीत शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात येणार असल्याचे व या जागांसाठी 5970 उमेदवारांनी अर्ज केल्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सांगितले.

बुधवारी पहाटे पाच वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. अधीक्षक ओला व अपर अधीक्षक प्रशांत खैरे यांनी प्रक्रियेची माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यावेळी उपस्थित होते. अधीक्षक ओला म्हणाले, कागदपत्रे, उंची, छाती, वजन मोजणी होऊन त्यानंतर पुढील मैदानी चाचणी होईल. गोळाफेक व काही चाचण्या मुख्यालयाच्या मैदानावर होतील. त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी रंगीत तालीम घेतली जाणार आहे. 1 हजार 600 मीटर धावण्याची चाचणी अरणगाव ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येणार आहे. प्रक्रियेसाठी कर्मचारी, अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

संपूर्ण चाचणी प्रक्रियेवर सीसीटीव्ही व कॅमेर्‍यांची नजर असेल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, पावसामुळे मैदानी चाचणी घेण्यास अडचणी आल्यास नव्याने तारीख देऊन त्या घेतल्या जातील. वाहन चालकांची वाहन चालवण्याची चाचणी मागील वर्षी प्रमाणे तपोवन रस्त्यावरील पोलिस प्रशासनाच्या जागेत होईल. राज्यभरातून उमेदवार येणार असून, त्यांना महाआयटी मार्फत वेळापत्रक निश्चित करून देण्यात आले आहे. प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. मात्र, पावसामुळे त्यांची कागदपत्रे व इतर साहित्याचे नुकसान होऊ नये, यासाठी मैदानावर तंबू उभारण्यात येणार असल्याचे अधीक्षक ओला यांनी सांगितले.

राज्यभरात एकाचवेळी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अनेक उमेदवारांनी एक पेक्षा जास्त ठिकाणी अर्ज केले आहेत. त्यात एखाद्या उमेदवाराला एकाच दिवशी दोन जिल्ह्यात चाचणीसाठी वेळ दिली असेल, त्यांनी पहिल्या ठिकाणी चाचणी द्यावी. दुसर्‍या ठिकाणच्या चाचणीसाठी किमान चार दिवसांनी त्यांना तारीख निश्चित करून दिली जाईल. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. याबाबत एक ईमेल आयडी व हेल्पलाईन क्रमांक देण्यात येईल, असेही अधीक्षक ओला यांनी स्पष्ट केले. 1 हजार 600 मीटर धावणे ही चाचणी अरणगाव बायपास ते वाळुंज बायपास रस्त्यावर घेण्यात येणार आहे.

त्यामुळे 19 जून ते 29 जून या कालावधीत दररोज सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अरणगाव बायपास चौक येथून वाळुंज बायपासकडे जाणारी वाहने महिले मळा, गंगाधर पवार, अरणगाव यांच्या घरापासून दरेकर वस्ती, किशोर दरेकर, वाळुंज यांचे घरापर्यंतची सर्व प्रकारची वाहतूक बंद राहील. ही वाहतूक एकाच लेनवरून होणार आहे. अरणगाव येथून वाळुंजकडे जाणारी वाहने रस्त्याच्या उजव्या लेनने डाव्या बाजूने जातील. वाळुंजकडून अरणगावकडे जाणारी वाहने डाव्या लेनने डाव्या बाजूने जातील, असे आदेश अधीक्षक ओला यांनी काढले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या