मुंबई | Mumbai
राज्यात यंदा अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे विरोधीपक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला आहे. विद्यमान सत्ताधारी महायुतीने निवडणुकांच्या काळात कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ती करावी, या मागणीसाठी बच्चू कडूंनी नागपूरपर्यंत शेतकऱ्यांचा मोर्चा काढला. गुरवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठीच्या कर्जमाफीचा मुद्दा महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी चर्चेत आलेला असतानाच अजित पवारांनी याबाबत केलेले एक विधान वादात सापडले आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजितदादा हे रोखठोक बोलतात हे सर्वांनाच माहिती आहेत. “शुन्य टक्के व्याज दराने कर्ज दिल्यावर ते वेळच्या वेळी फेडायची सवय लावा ना. सारखं फुकटात, सारखं फुकटात, सारखं माफ, सारखं माफ, मग कसं व्हायचं? असं नाही चालत. एकदा शरद पवार यांच्या काळात कर्ज माफ झालं. एकदा देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कर्जमाफी झाली. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये असताना कर्जमाफी झाली. 2024 मध्ये आम्हाला निवडून यायचं होतं, आम्ही माफ करु आम्ही माफ करू, मग करा माफ. काही हजार कोटी रुपये लागणार आहेत ना त्याला.” अशा शब्दात अजितदादांनी वक्तव्य केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
रोहित पवारांची टीका
अजित पवारांच्या या विधानावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिप्रश्न केला आहे. “शेतकरी वेळच्या वेळी कर्ज भरतो, पण सरकारच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नसेल तर शेतकऱ्याने कर्ज फेडायचे तरी कसे?” असा सवाल रोहित पवारांनी एक्सवर केलेल्या पोस्टमधून केला आहे.
“निवडणुका होत्या म्हणून आश्वासन दिले, शेतकऱ्यांनी आर्थिक शिस्त लावावी, वेळच्या वेळी कर्ज फेडावे यासंदर्भात आपण केलेलं वक्तव्य अत्यंत निंदाजनक असून शेतकऱ्यांची खिल्ली उडवणारं आहे. संगतीचा हा परिणाम असला तरी आपल्याकडून ही अपेक्षा नव्हती! शेतकऱ्यांना दिलासा देता येत नसेल तर किमान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ तरी चोळू नका. आता मीठ चोळलं तर दिलगिरी व्यक्त कराल, ही अपेक्षा! महत्वाचं म्हणजे हे सगळं बघितलं तर काल सरकारने दिलेलं आश्वासन म्हणजे बुडणाऱ्या बँकेचा कधीही न वटणारा post dated चेक आहे , असंच म्हणावं लागेल”, असेही रोहित पवारांनी नमूद केले आहे.
कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही – राजू शेट्टी
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावर राजू शेट्टी यांनीदेखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “शेतकरी काही भीक मागत नाही. मला अजित पवारांचं मान्य आहे. पण त्यासाठी आधी सरकार म्हणून अजित पवारांनी एक व्यवस्था करावी. महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यावर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीत शेतमाल विकण्याची वेळ येणार नाही अशी धोरणं सरकारनं तयार करावीत. त्यांच्याकडे वारंवार कर्जमाफी मागायला आम्ही काय भिकारी नाही”, असं राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या वतीने अजित पवारांना म्हणाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




