पुणे | Pune
विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या (Cabinet Expansion) मुद्द्यावरून शिंदे सरकारवर गेल्या काही दिवसांपासून टीकेची झोड उठवली आहे. आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या तोंडातून लवकरच, लवकरच, लवकरच इतकेच शब्द येत आहेत. होईल, होईल.. पण कधी होईल याचे उत्तर यांच्याकडे नाही, असा टोला पवार यांनी लगावला. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार दिल्लीतील सिग्नलशिवाय होईना. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना सध्या मदत हवी आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी कोणाची आहे, असा सवालीही अजित पवार यांनी केला.
या सगळ्यावर शिंदे-फडणवीस सरकारकडून आम्ही दोघे आहोत, असे उत्तर दिले जाते. पण ही काम फक्त दोघांनी करण्यासारखी आहेत का याचा विचार होण्याची आवश्यकता आहे. या दोन्ही नेत्यांनी याचे आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असंही अजित पवारांनी सूचवलं आहे.