मुंबई | Mumbai
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनला सोमवारी, २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. अशामध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी, विधिमंडळाच्या सदस्यांनी दोन्ही सभागृहात अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी जयंत पाटील बोलत होते.
२८ जानेवारीला अपघात झाला आणि दादांसारखा नेता नियतीने हिरावून नेला. कुणाची नजर लागली काही माहित नाही. पण, महाराष्ट्राच्या राजकारणाला नजर लागली आणि दादांसारखा नेता आपल्यातून गेला. महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का, अशी शंका येत असल्याच्या भावना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्यात मोठ्या अपेक्षेने ज्यांच्याकडे बघितले जाते, त्यांनाच हिरावून घेण्याची नियतीची पद्धत आहे का? अशी शंका येते. “विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, आर. आर. पाटील आणि अजितदादा निघून गेले. आपण दादांसोबत गेल्या 35-40 वर्षांपासून काम केले. दोन दशके अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती भागात होते. दादा काय करणार? आणि दादांच्या पक्षाची भूमिका ही गेल्या वीस-पंचवीस वर्षांत महाराष्ट्रात फार महत्वाची ठरली. त्यामुळे जेव्हा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा अनेक दिग्गजांची नावे येतील. पण, अजितदादांचे नाव लिहिल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होणार नाही,” असे ते पुढे म्हणाले.
Iran US Conflict: युद्धाच्या छायेत इराण: भारतीयांसाठी दुतावासाची महत्त्वाची सूचना जारी
जयंत पाटील पुढे म्हणाले की, दादांचं स्वभाव होता की, जे मनात येईल ते बोलायचे. एका जाहीर सभेत ते आर आर आबांना तंबाखू खाण्याच्या संदर्भात बोलले होते. दादा इतके बोलले की आबांना देखील कदाचित वाईट वाटले असेल. मी आबांच्या घरी जाऊन त्यांना म्हटलो की माझ्या व्यासपीठावरून दादा बोलले, मी माफी मागतो. पण, दादा बोलले ते काही चुकीचे नाही, हे देखील मी हा आबांना बोललो होतो. ज्याचं चुकलंय ते तोंडावर सांगायचं, असा दादांचा स्वभाव होता.
दादा माझ्याकडे आले तर म्हणाले तुम्ही कशी संस्था चालवता? ते म्हणाले तुमच्याकडे झाडच नाहीत. बारामतीला या तुम्हाला दाखवतो की कसे झाडं आहेत बघा. मला घर बांधा म्हणून ते वारंवार सांगायचे. दादांची राजकीय समज प्रचंड होती. मी अध्यक्ष झालो त्यावेळी ओहोटीचा काळ होता. त्यावेळी पक्षाच्या अध्यक्षाला सांगून ते निर्णय घेत होते. संघर्ष यात्रा काढली त्यावेळी सर्व व्यवस्था विखे-पाटील यांनी केली होती. त्यावेळी दादा म्हणाले होते की, हे चांगली व्यवस्था करतात, त्यांनाच आपल्याकडे खेचलं पाहिजे. दादा जर आपल्यात असते तर कधी ना कधी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर बसले असते. मधल्या काळात त्यांच्या आणि माझ्या बैठका सात ते आठ वेळा झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड खुशी होते, हे मला नमूद करावंस वाटतंय. तू असशील मोठ्या बापाचा पण मी पण मोठ्या काकांचा आहे, अस ते एका भाषणात म्हणाले होते. यातून त्यांचं पवार साहेब यांच्यावरील प्रेम दिसून आलं, असे देखील जयंत पाटील म्हणाले.





