मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. २८) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवार यांचे निधन झाले आणि आज ते आपल्यात नाहीत, यावर विश्वास करणे सर्वांसाठीच कठीण आहे. अजित पवार यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबियांवरच नाही तर राज्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्रीपद कोणाकडे जाणार? अर्थसंकल्प कोण मांडणार? राष्ट्रवादी पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाणार असे एक नाही तर अनेक प्रश्न सध्या समोर आहेत. याबाबतच आता राजकीय घडामोडींना काल रात्रीपासून वेग येऊ लागला आहे. यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.
पुढील महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कोणत्याही प्रचार सभा किंवा रोड शो न घेण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारांना आता सभा किंवा मोठ्या रॅली काढता येणार नाहीत. त्याऐवजी, केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटून निवडणूक लढवण्याचे निर्देश पक्षाने दिले आहेत.
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यातच, निवडणुकीसाठी केवळ सात दिवस शिल्लक असताना हा निर्णय घेण्यात आला असून, ही कृती अजित पवार यांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहण्यासारखी आहे, असे मानले जात आहे. उमेदवारांसमोर आता केवळ पत्रकाद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान आहे. निवडणुकीत उमेदवार निवडून आल्यानंतरही कोणतीही विजयी मिरवणूक काढली जाणार नाही, असे पक्षाने स्पष्ट केले आहे.




