मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि. 28) विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालेय. गुरुवारी अत्यंत शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नि दिला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी अजित दादा अमर रहेचा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला. दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात कसा झाला यावर वेगवगेळ तर्क लावण्यात येत आहे. काहींनी हा घातपात असल्याचा आरोप केला. काहींनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली. या विमान अपघाताप्रकरणी तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेच.
राज्य सरकारकडून अजित पवारांच्या विमानाच्या अपघाताचे सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. त्याचबरोबर बारामती पोलीसांना अपघातस्थळावर कोणालाही जाऊ न देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फॉरेन्सिक टीमने आधीच या अपघातस्थळी जाऊन नमुने तपासणीसाठी गोळा केले आहेत. हा तपास करताना बारामती पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार आहे.
विमान अपघात तपास ब्युरोकडून (AAIB) कडून तपास सुरू झाला आहे. तीन सदस्यीय पथकाने ब्लॅकबॉक्स ताब्यात घेतला आहे. विमान अपघात आणि घटना याचा तपास सुरू करण्यात आला आहे. कालबद्ध पद्धतीने आणि पारदर्शक पद्धतीने हा तपास होईल. या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्ड्स, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे.
संपादकीय : ३० जानेवारी २०२६ – जीव अनमोलच
विमान २८ जानेवारी रोजी सकाळी ८.१८ वाजता पहिल्यांदा बारामतीच्या एटीसीच्या संपर्कात येते. या अहवालानूसार वैमानिकांना सांगण्यात आले की सध्या वारा फार नाही आणि दृश्यमानता साधारण 3000 मीटर इतकी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने सांगितले की ते रनवे क्रमांक ११ च्या दिशेने येत आहेत. पण त्यांना रनवे दिसत नाहीय. नंतर पायलटने पुन्हा एटीसीला सांगितले की रनवे दिसू लागला की सांगतो. त्यानंतर ८.४३ वाजता रनवे क्रमांक ११ लँडिंगसाठी सज्ज करण्यात आला. मात्र पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर काही क्षणातच धावपट्टीच्या डाव्या बाजूला आग आणि धुर उठताना दिसला, असे एटीसीवर काम करत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सीआयडीकडे तपास
दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी वेगवेगळे तर्क लावण्यात येत असल्याने याप्रकरणी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या विमान अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने पण सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विविध माध्यमातून या अपघाताची चौकशी होईल आणि तथ्य समोर येईल. तसेच लोकांच्या मनातील शंकाकुशंका व्यक्त होत असताना या अहवालातून अनेक मुद्दे समोर येण्याची शक्यता आहे. ही तांत्रिक चूक होती की पायलटची चूक होती हे समोर येईल.





