लोणी (वार्ताहर)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील तीन उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या सामंज्यस्य करारा मध्ये अकोले तालुक्यात २०० मेगाव्हॅट क्षमतेच्या सरोवर उदंचन जलविद्युत प्रकल्पाचा समावेश असून, सुमारे २०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यत पंप स्टोरेजमध्ये सुमारे ७६ हजार ११५ मेगाव्हॅट क्षमतेपर्यंत मजल मारली आहे. महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यशस्वी प्रयत्न सुरु केले आहेत.नागपुर हिवाळी आधिवेशना दरम्यान झालेल्या सामंजस्य करारातून २३ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पांमध्ये होणार असून, या माध्यमातून राज्यात ११ हजार ५०० रोजगार निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्य सरकारने अकोले येथील सरोवर उदंचन प्रकल्पासह (२०० मेगॅवाॅट) पश्चिम घाट (५२००मेगॅवाॅट) व कोयना टप्पा ६ (४००मेगॅवाॅट) आशा तीन प्रकल्पांचे करार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जलसंपदा विभागाने कंपन्याशी केले असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी दिली.
आपल्या जिल्ह्यातील अकोले तालुक्यात २०० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून सरोवर उदंचन जलविद्युत गुंतवणूक प्रकल्प निर्मितीला प्राधान्य देण्यात आले असून, न्यु एशियन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हल्पमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीशी सामंजस्य करार झाला असून, २०० मेगाव्हॅट क्षमतेचा प्रकल्प कार्यान्वित होण्यामुळे १ हजार ५० एवढी रोजगार निर्मिती होणार असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी आतापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने ५४ सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे ७६ हजार ११५ मेगाव्हॅट वीजनिर्मिती होणार असल्याचे स्पष्ट करुन मंत्री विखे पाटील म्हणाले की, अकोले येथील प्रकल्पा प्रमाणेच पश्चिम घाट उदंचन जलविद्युत प्रकल्प तसेच कोयना टप्पा ६ उदंचन जलविद्युत प्रकल्प यासाठीही कंपन्यांशी राज्य सरकारने करार केले आहेत. यामुळे राज्यात ४.०६ लाख कोटी रुपये इतकी गुंतवणूक तसेच १ लाखाहून अधिक मनुष्यबळ रोजगार निर्मिती होईल.




