मुंबई | Mumbai
बीड जिल्ह्यामधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case Accused ) राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना सीआयडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे.
न्यायालयातील सुनावणीदरम्यान याबाबतची माहिती आज एसआयटीकडून (SIT) देण्यात आली. संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतर सर्व आरोपींवर मकोका (मोक्का) अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती. आतापर्यंत पोलिसांनी एकूण आठ जणांना या प्रकरणात अटक केली असून त्यांच्यावर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली नव्हती. त्यानंतर अखेर आज सुदर्शन घुले, प्रतिक घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, कृष्णा आंधळे, जयराम चाटे आणि सिद्धार्थ सोनवणे या आरोपींवर पोलिसांनी मकोका लावला आहे. मात्र,वाल्मिक कराड याच्यावर मकोका लावण्यात आलेला नाही. तो खंडणीच्या (Extortion) गुन्ह्यात अटक असून पोलिस त्याचा तपास करत आहेत.
दरम्यान, ९ डिसेंबर रोजी बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह बीडमधील लोकप्रतिनिधी आवाज उठवत होते. तसेच बीड, धाराशिव, परभणी, पुणे आणि वाशिमसह राज्यभरात जनआक्रोश मोर्चे काढण्यात आले होते. प्रशासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर आज आठ आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे.
कृष्णा आंधळे फरारच
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला महिना उलटला तरी देखील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरारच आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक कऱण्यात आली असून फरार कृष्णा आंधळे याच्यावर पोलिसांनी मकोका लावला आहे. तर कृष्णा आंधळेचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देत असून आंधळे याची बँक खाते गोठविण्यात आली आहेत. तसेच त्याच्या निकटवर्तीय लोकांचीही चौकशी केली जात आहे.
मकोका कोणावर लागतो?
संघटित स्वरुपाची गुन्हेगारी असेल तर मकोका (मोक्का) लागतो. एका व्यक्तीवर मकोका लागत नाही. मकोका लावताना गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेतली जाते. गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा अधिक म्हणजेच टोळी असेल तर मकोका लागतो. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मकोका लावला जातो. मकोकाच्या कलम ३ (०१) नुसार आरोपींना किमान ५ वर्ष ते जन्मठेप अशी शिक्षा होऊ शकते. यात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची देखील तरतूद आहे.