अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
करोनामुळे नगर शहर हवालदिल झाले असले, तरी करोनाच्या नावाखाली अत्यावश्यक कामांकडेही पाठ फिरविली जात असल्याने भविष्यात मोठा पाऊस झाल्यानंतर नगर शहराची दैना उडण्याची शक्यता अधिक आहे. या शिवाय भर पावसाळ्यात रस्त्याची कामे सुरू करून त्याच्या दर्जेदारपणावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला आहे. रोज रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यावर नियंत्रणासाठी महापालिकेसह जिल्हा प्रशासनाला मोठी ताकद खर्च करावी लागत आहे. हे जरी खरे असले, तरी करोनाबरोबरच शहरातील अत्यावश्यक प्रश्न सुटणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. शहरात अनेक ठिकाणी पाण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. काही ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे. करोनाच्या काळात आरोग्याचे इतर प्रश्न निर्माण होणे धोक्याचे आहे.
उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी थेट नळालाच मोटारी बसविण्यात आल्याने अनेकांना पाणी पुरेसे मिळत नाही. मोटारी जप्त करण्यासाठी महापालिकेने पथक स्थापन केले होते. या पथकाने गेल्या अनेक दिवसांत एकही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. एवढेच नव्हे, तर महापालिकेचे कर्मचारी प्रभागाप्रभागांत फिरून मोटार लावणार्यांकडून स्वतःसाठी ‘दंड’ वसूल करत असल्याच्याही तक्रारी आहेत. मात्र थेट नळाला मोटारी लावणार्यांमुळे अनेकांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जात आहे.
नालेसफाईबाबतही गोंधळाचे वातावरण आहे. नालेसफाई झाली ती केवळ ठेकेदाराचे देयक अदा करण्यासाठीच होती की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्यंतरी दोन-तीन मोठे पाऊस झाल्यानंतर अनेकांच्या वसाहतींमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. सफाई झाली तर ते वाहून न जाता वसाहतींमध्ये कसे शिरले, याचे उत्तर कोणीही देत नाही. आमदार संग्राम जगताप यांनीही नालेसफाईच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. महापालिका अधिकारी मात्र तेवढ्यापुरते तेवढे ऐकून घेऊन त्या प्रश्नाकडे सपशेल पाठ फिरवतात.
सावेडी उपनगरातील टीव्ही सेंटर चौक ते भिस्तबाग चौक हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याचे काम मंजूर होऊन जवळपास दीड वर्ष उलटले आहे. मात्र ते सुरू करण्यासाठी कोणतीही कार्यवाही वेगाने झाली नाही. आख्खा उन्हाळा गेला. या काळात करोनामुळे कामे बंद असली, तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात रस्त्याची कामे सुरू करण्यास परवानगी दिलेली होती. एप्रिल, मे महिना याबाबत महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर आता या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. पावसाळ्यात रस्त्याची कामे करण्यास मनाई असते. याची जाणीव असतानाही केवळ देखावा म्हणून काम सुरू केल्याचे दिसून येत आहे.
महापालिकेच्या प्रशासनातही समन्वय राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कोणाच्या कुठे नियुक्त्या केल्यात, ते तेथे काम करतात का, एकाच कर्मचार्याला कुठे कुठे काम करण्याचे आदेश दिले जातात याचा कुणालाच मेळ नाही. विभागप्रमुख करोनाच्या नावाखाली बाहेर असल्याने कार्यालयीन कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्याबाबतही प्रशासनात चांगले मत नाही. लवकर निर्णय घेत नसल्याने कामे मार्गी लागत नसल्याचे त्यांच्याबाबत बोलले जाते.