अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महापालिकेच्या सुमारे साडे बाराशे म्हणजे 70 टक्के कर्मचार्यांचा फेब्रुवारीचा पगार सोमवारी (30 मार्च) बँकेत जमा झाला. मनपा प्रशासनाने मनपा फंडातून सुमारे 4 कोटी रुपयांची तरतूद यासाठी केल्याचे समजते. त्यामुळे पगाराच्या मागणीसाठी पुकारलेले काम बंद आंदोलन कामगार संघटनेने स्थगित केले. दरम्यान, आज मंगळवारी (31 मार्च) आर्थिक वर्षअखेर असल्याने शासनाकडे थकीत असलेले फेब्रुवारी महिन्याचे जीएसटी अनुदान उद्या येऊ शकते. ते आल्यावर राहिलेल्या 30 टक्के कर्मचार्यांचे व चार हजारावर निवृत्तांचे निवृत्तीवेतन अदा करण्यात येणार आहे.
मागच्या महिन्यात शासनाकडून जीएसटी अनुदान आले नसल्याने मनपा कर्मचार्यांचे पगार व निवृत्तीवेतन रखडले होते. नुकत्याच झालेल्या मनपा बजेट महासभेच्या वेळी कामगार संघटनेने आंदोलन केले होते व सोमवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी विकास भारमधून पगार करावेत व शासनाचे अनुदान आल्यावर ते तिकडे वळते करावे, असे नगरसेवकांनी सुचवले होते. या पार्श्वभूमीवर, आयुक्त यशवंत डांगे यांनी मनपा फंडातून सुमारे 4 कोटी रुपये कर्मचार्यांच्या पगाराकडे वळते केले. यातून 70 टक्के कर्मचार्यांचे वेतन बँकेत जमा झाले आहे.
30 टक्के म्हणजे सुमारे तीनशेवर कर्मचारी राहिले असून, त्यांच्या वेतनासाठीचे सुमारे दीड कोटी रुपये तसेच चार हजारावर निवृत्तांचे सुमारे साडेपाच कोटींचे निवृत्तीवेतन शासनाचे जीएसटी अनुदान आल्यावर दिले जाणार आहे. उद्या आर्थिक वर्षाखेर असल्याने हे अनुदान उद्याच येण्याची आशा आहे. दरम्यान, उद्याच मार्च महिनाही संपत असल्याने पुढच्या एप्रिल महिन्यात मार्च महिन्याचे वेतन व निवृत्तीवेतन अदा करण्यासाठी सुमारे 13 कोटींची गरज मनपाला भासणार आहे. उद्या फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे थकीत जीएसटी अनुदान शासनाने अदा केले तर मनपा प्रशासनाला दिलासा मिळणार आहे.




