अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेसाठी शासनाच्या माध्यमातून नवीन शीघ्र प्रतिसाद वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या विशेष वाहनामुळे आगीच्या घटना, आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्ती व्यवस्थापनास जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार शिवाजी कर्डिले, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर आदी उपस्थित होते.
शासनाच्या माध्यमातून अग्निशमन दलात दाखल झालेल्या या वाहनामुळे आग, अपघात, इमारत कोसळणे अशा घटनांमध्ये तत्काळ मदत पोहचवण्यासाठी उपयोग होणार आहे. सर्व सुविधायुक्त असलेले शीघ्र प्रतिसाद वाहन नागरिकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी, नागरिकांना वाचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे. दरम्यान, विधीमंडळाच्या अधिवेशनात महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या बळकटीकरणाकडे सरकारचे लक्ष वेधले होते. सरकारने त्याची दखल घेत उपाययोजना सुरू केल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
आधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहन 20 फूट लांबीचे असून, आपत्कालीन परिस्थितीत त्वरित घटनास्थळी पोहोचण्यासाठी त्याची रचना करण्यात आली आहे. वाहनात प्राथमिक उपचार, स्ट्रेचर उपलब्ध आहेत. आगीवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी 300 लिटर पाण्याची व 30 लिटर फोमची क्षमता आहे. इमारत कोसळल्यास किंवा एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत, अपघातस्थळी मदत कार्यासाठी, बचाव कार्यासाठी आपत्कालीन टूल बॉक्स, लाईफ जॅकेट, वूड कटर आदी साहित्य सामग्री उपलब्ध असणार आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहचवण्यासाठी या वाहनाचा उपयोग होणार आहे.